Tuesday, November 28, 2006

रविवार माझ्या आवडीचा ...!!??!!

दिवस उद्याचा हा सवडीचा
रविवार माझ्या आवडीचा

गेले कित्येक रविवार काम, खरेदी, कुणाचे वाढदिवस अशातच चालले आहेत. खुप दिवसापासुन रविवारी फ़क्त आराम करायचा, गाणी वगैरे ऐकत मनसोक्त पुस्तके वाचायची, मनसोक्त चित्रे काढायची इच्छा आहे. मला आठवतात ते सगळे लहानपणीचे रविवार असेच मस्त लोळत पुस्तक वाचलेले किंवा रंगाच्या गराड्यात बसुन असंख्य चित्रे काढलेले. टेलीव्हीजन नावाचा प्रकार मी लहान असताना म्हणजे मी १०वी मधे जाईपर्यंत घरी आलेला नव्हता त्यामुळे तो सगळा वेळ मला माझे बरेच उद्योग करण्यासाठी वापरता यायचा.

रविवार सकाळ सुरु व्हायची ती नेहेमीप्रमाणे पप्पांनी लावलेल्या रेडीओमुळे, जी अजुनही होते कराडला गेले की! मग मम्मीने कप मधे घालुन दिलेले दुध गरम आहे म्हणुन तासभर पित बसायचे. तास अन तास दुध पित बसते ही रोजची ओरडणी रविवारी पण चुकायची नाहीत! मग अंघोळ वगैरे करुन आठ सव्वाआठला बालोपासनेला जायचे आणि रमत गमत साडेदहा पर्यंत परत यायचे. कधी मम्मी पप्पा मंडईत गेलेले असायचे, मग ते येईपर्यंत लैलाच्या आई घरात बसवुन ठेवायच्या. तोपर्यंत मग पेपर अलेला असेल तर (तेव्हा कराडला लोकसत्ता दुपारपर्यंत कधीतरी यायचा) बालविभाग वाचत बसायचे. किशोर, कुमार ही मासीके पण घरी यायची, अमृत पण असायचा काहीतरी वाचत बसायची खोड लागली. मम्मी पप्पा मंडईतुन आले की जेवण करुन जेवुन मम्मी पेपर वाचत बसायची कोडी सोडवणे हा तिचा आवडता छंद होता. दुपारभर चित्रे काढणे, सुबोधबरोबर भांडणे, बाहेर खेळायला जाऊ का अशी भुणभुण लावणे. पप्पांची डुलकी झाली की ते दुपारी विविधभारती, किंवा सिलोन रेडीओवर हिंदी गाणी लावायचे. काही कळायचे नाही पण कानावर पडायचे.

कधी कधी सकाळी उठायला उशीर झाला आणि बालोपासनेला गेले नाही तर मग सकाळचे बालोद्यान ऐकायला मिळायचे. शमा खळे, रचना आणि योगेश खडीकर यांची गाणी अगदी तोंडपाठ होती. पप्पांना गाणी ऐकायची प्रचंड हौस होती (आणि अजुनही तितकीच आहे!) त्यामुळे कामगार सभा, आपली आवड, लहान मुलांची आपली आवड, दुपारी मुंबई ब केंद्रावर लहान मुलांच्यासाठी कथावाचन वगैरे असायचे. फास्टर फेणे, गोट्या पहिल्यांदा तिथे ऐकले. टी.व्ही नव्हता त्यामुळे संध्याकाळी सगळी गल्ली डबाऐसपैस, लगोरी, लपाछपी असले फुटकळ खेळ खेळायचो. पण ते सुद्धा संध्याकाळीच कारण मम्मी पप्पा आज्जीबात दिवसभर घरातुन बाहेर पाठवायचे नाहीत. घरात बसुन वाचन करणे, अभ्यास करणे, चित्रे काढणे हे सगळ्यात महत्वाचे वाटे. आजुबाजुला रहाणारी मुले-मुली म्हणजे एका वर्षात २ वेळा बसले तरी चालते ह्या प्रकारात मोडणारी होती त्यामुळे पण असेल. आठवीनंतर ३ वर्षे शेजार नव्हताच त्यामुळे मग माझेच काही काही उद्योग चालायचे. त्या दरम्यान रवीवारच्या सुट्टीत केलेला एक अतीशय महत्वाचा उद्योग म्हणजे मैत्रीणीन्च्या घरी जाउन वेगवेगळी फुलझाडे गोळा करणे, वेलींना आलेल्या फुलांचे गाठींचे गजरे करणे!!

काय धमाल दिवस होते! गेल्यावर्षी मामेभावंडांचे रविवार बघीतले आमच्याच गावात, ह्या पोरांना रेडीओ माहीत नाही, बालगीते माहीत नाहीत, दिवसभर कसले कसले क्लास आणि टी. व्ही.!! कळत नाही ही मुले काही गमावताहेत की आम्ही खुप सारे क्लास न करुन खुप काही शिकलो नाहीये ...

जोगीण

काल प्रिया च्या चाट चा status message ह्या कुसुमाग्रजांच्या कवितेच्या पहिल्या ३ ओळी होत्या. मी कवीतांपासुन नेहेमी ४ हात लांब रहाणारी, पण ह्या ओळी मात्र एकदम भावल्या. तिच्या परवानगीने मग मी तो माझा status message केला (अर्थात तिला दुसरी ह्या कवितेसारखी अजुन एक मस्त कविता मिळालीच!!) त्यावर अजुन एका मैत्रीणीने विचारल्यावरुन ही सगळी कवीता इथे टाकतेय.

जोगीण

साद घालशील तेव्हाच येईन,
जितकं मागशील तितकंच देईन...
दिल्यानंतर देहावेगळ्या सावलीसारखी निघून जाईन...

तुझा मुगुट मागणार नाही,
सभेत नातं सांगणार नाही...
माझ्यामधल्या तुझेपणात जोगीण बनुन जगत राहीन...

~कुसुमाग्रज

सुमेधा, वृषाली सारख्या मैत्रीणीना आश्चर्याचा धक्का बसल्यावाचुन रहाणार नाहीये !!!

Tuesday, November 21, 2006

एकटेपणा

मला सगळ्यात जास्ती नकोसा वाटतो तो एकटेपणा. मला आठवतेय तशी मी सतत माणसांमधेच राहीले आहे. पण माणसांच्या गोतावळ्यात राहुनही कधीकधी एकटेपणा घेरतो त्याला काय म्हणायचे? मला आठवतेय ४थी मधे शाळा सुटल्यावर scholaship चा क्लास असायचा. तो झाला की मी आणि मेघु टंगळमंगळ करत घरी जायचो. घरी जाईपर्यंत साधारण २ वाजायचे म्हणुन शाळा सुटल्यावर खाण्यासाठी मम्मी पप्पांच्याबरोबर १०.३० ला चपाती-भाजी किंवा भाजी-भाकरी-लोणी असा डबा द्यायची. वर्गात सगळ्यांचेच तसे डबे यायचे. आम्ही शाळा सुटल्यावर साधारण १२ वाजता तो डबा खायचो.
घरी पोहोचायचे तेव्हा मम्मीच्या शिकवण्या, शिवणकाम, शिवणकामाचे क्लास असे काही ना काहीतरी चालु असायचे. त्यामुळे मग मला राहिलेला भात वगैरे एकटीलाच खावे लागायचे. एकटीला जेवताना अज्जिबत जेवण जायचे नाही. कसे तरी पोटात ढकलायचे आणि अभ्यास किंवा खेळ सुरु करायचा. मला अजुनही कधितरी ते एकटीने जेवलेले आठवते आणि एकदम एकटेपणाची जाणीव होते. गेले काही दिवस असेच एकटीने जेवतेय. घर थंड पडलेले, बाहेर ५ वाजताच दाटुन आलेला काळोख, ह्या सगळ्यामुळे खाण्याची इच्छाच नाहीशी होते. मग हा एकटेपणा घालवण्यासाठी रोज घरी भारतात फोन करायचा किंवा मग रात्री उशीरापर्यंत chatting करत बसायचे. सकाळी मग नीट जाग येत नाही वेळेवर मग निश्चय करायचा कि आजपासुन वेळेवर झोपायचे!
सध्या घरी सुबोधच्या लग्नाची तयारी खुप जोरात चालली आहे आणि मी सगळे मिस करतेय. ते मला मिस करताहेत की नाही महिती नाही, असावेत असे वाटतेय. पण ह्या सगळ्यामुळे मला माझ्या एकटेपणाची जाणीव खुप प्रकर्षाने होते आहे. जेवावे वाटत नाही. काहीही न करता फ़क्त बसुन रहावे असे वाटत रहाते. सगळ्या जगावर चिडचिड होते. पण ती चिडचीड कुणालाच कळत नाही.

गेले काही वर्षे एका अर्थाने एकटीच रहातेय, पण एकटेपणाची सवय मात्र अजीबातच झालेली नाहीये. कधीकधी ह्या गोष्टीचा आनंद होतो कधी स्वत:चा प्रचंड राग येतो.

आज मला सतत ऐकावे वाटतेय असे गाणे -
मै और मेरी तनहायी अक्सर ये बाते करते है।



ह्या गाण्याचा आणि एकटेपणाचा काही संबंध आहे का? असावा ...