Sunday, March 26, 2006

माणसामाणसातला फरक

ही आठवण देखील मी कोल्हापुरला असतानाची ...
M. Sc. ला शिवाजी विद्यापिठात होते. तिथल्या मराठी विषयाच्या कुलकर्णी नावाच्या एका प्राध्यापकाना ज्ञानेश्वरीची सर्वात जुनी प्रत मिळालेली. त्याचे त्यांनी संपादन केले होते. त्या ज्ञानेश्वरीचा प्रकाशन समारंभ होता. त्या कार्यक्रमाला श्री. बाबामहाराज सातारकर आणि न्यायमुर्ती यशवंतराव चंद्रचुड हे आलेले. बाबामहाराजांचे ज्ञानेश्वरीतील एका ओवीवर किर्तन झाले. त्यानंतर न्यायमुर्तीनी पण ज्ञानेश्वरीवर थोडक्यात निरुपण केले. त्यादिवशी प्रथम मला कळले की त्यांचा पण ज्ञानेश्वरीचा किती अभ्यास आहे.

कार्यक्रम संपला आणि व्यासपिठावरुन सांगितले गेले की न्यायमुर्ती आणि बाबामहाराज आता लोकाना स्वाक्षरी देतील. त्यावेळी सुवर्ण ज्ञानेश्वरी वगैरे चाललेले. मला त्यावेळी जरा स्वाक्षर्या गोळा करायची सवय होती. माझा नंवर आल्यावर मी त्या खोलीत गेले. मी पहिल्यांदा बाबामहाराजांच्यासओर उभी राहीले. ते म्हणाले, 'माझी स्वाक्षरी हवी असेल तर माळ घालावी लागेल आणि सुवर्ण ज्ञानेश्वरीसाठी देणगी द्यावी लागेल.' मी त्यांना म्हणाले, 'मी मांसाहार आणि मद्यपान करत नाही तर मी माळ घातली आणि नाही घातली तरी काय फरक पडतो.' ते म्हणाले, 'माझा नियम आहे स्वाक्षरी हवी असेल तर हे करावेच लागेल!' मी तिथुन निघाले. न्यायमुर्ती मला म्हणाले, 'बाळ! इकडे ये.' मी त्यांच्याकडे गेले. ते म्हणाले, 'माझी चालेल का स्वाक्षरी चालेल का?' मला एकदम आनंद झाला आणि मी त्यांच्यापुढे माझी वही पुढे केली. त्यांनी मला माझे नाव विचारले, मी सांगितले. माझे नाव थोडे वेगळे असल्याने त्यांनी अर्थ विचारला, मी सांगितला. त्यांनी वहीवर माझे नाव लिहीले आणि खाली लिहिले 'मोठी हो.'

त्यांना नमस्कार करुन मी तिथुन निघाले. मला दोन माणसांनी दिलेल्या वागणुकीवरुन माणसामाणसातला फरक कळला.

Friday, March 24, 2006

अरुंधती -- एक मैत्रीण

मी २ री किंवा ३ री मधे असतानाची गोष्ट. शाळेमधे माझी आवडती मैत्रीण हा निबंध लिहुन आणायला सांगितला होता. त्यावेळी आवडती मैत्रीण म्हणजे शेजारी बसणारी मुलगी हे समिकरण होते. म्हणुन मग मी माझ्या वैशाली नावाच्या मैत्रीणीवर निबंध लिहायला सुरुवात केली. पण तिचे केस मोठे आहेत, ती मला खुप आवडते आणि अशीच २ - ३ वाक्ये लिहीली आणि मी मम्मीकडे गेले - मला आता पुढे काहीतरी सांग म्हणत. ती म्हणाली, मला तुझी वैशाली कोण ते कुठे माहीती आहे. मग थोदी चिडचिड झाली आणि मी रुसुन दुसरा अभ्यास सुरु केला. सकाळी शाळेत जाण्याअगोदर परत आठवण झाली कि निबंध लिहायचा आहे. परत मम्मीच्या मागे लकडा. मग मम्मी म्हणाली, मी सांगते ते लिहिणार असशील न रडता तर सांगते. तिने सांगायला सुरुवात केली - माझ्या आवडत्या मैत्रीणीचे नाव अरुंधती पुढे असेच काही काही. शाळेतल्या निबंधाचे काम झाले म्हणुन मी खुष होण्याचे सोडुन हे केवढे मोठे नाव, मला ह्या नावाची मुलगी पण माहीती नाही हेच विचार डोक्यात. पण का कुणास ठावुक ते नाव मात्र माझ्या डोक्यात बसले.

पुढे मी अमेरीकेमधे M. S. करताना मला एक मैत्रीण मिळाली - अरुंधती !! पण तोपर्यंत हा प्रसंग माझ्या पूर्ण विस्मरणात गेला होता. आता ती आणि मी खुप चांगल्या मैत्रीणी आहोत. परवा घरुन office ला येता येता मला वरचा प्रसंग आठवला. काही काही प्रसंग भविष्याची नांदी असतात का?