Thursday, May 11, 2006

जेव्हा तिची नी माझी रानात भेट झाली ...

१० वी ची पूर्व परीक्षा चालु होती. दुसरा दिवस - इंग्लिश आणि जीवशास्त्र असे २ पेपर होते. मी आणि अंजु नेहेमीप्रमाणे अगदी १२ वाजायला शाळा भरायची तर ११.४५ ला घरातुन निघालेलो. पेपरची धाकधुक होतीच. त्यातुन पाणंदीतुन जाणारा म्हशींचा कळप दिसला. मी थांबले आणि अंजुला म्हणाले आता आपल्याला पोचायला नक्कीच उशीर होणार. ती म्हणाली काही नाही होत उशीर. आणि तिने स्वत:ची सायकल तशीच त्या म्हशींच्यामधुन दामटवली. आणि ती त्या कळपाच्या दुसर्या टोकाला जावुन माझी वाट पहात उभी राहीली. मी घाबरत घाबरत माझी सायकल म्हशींच्या घोळक्यात घातली आणि दोन म्हशींचे जे काय भांडण लागले म्हणता!! नळावर कशा बायका एकमेकींच्या अंगावर धावुन जातात अगदी तस्सेच एक म्हैस दुसरीच्या अंगावर गेली की धावुन. तिला बापडीला काय पडलेले की मनुष्य नामक एका प्राण्याचे एक छोटे पिल्लु सायकल नामक वहानावर बसुन तिथुन जातय. तिने जी ढुशी मारली म्हणता!! मला हलकासा (??)धक्का देउन तिने तिच्या मैत्रिणीवर हल्ला केला. दुसरी बाई थोडीच गप्प बसणार आहे? तिने लगेच उलट धक्का मारला. ह्या सगळ्या हलक्या धक्क्यांचा परीणाम म्हणून मी एकदम पाणंदीच्या कडेला झाडात जाउन पडलेले. त्या नादात माझा चष्मा सुरक्षीत ठेवु शकले. तोपर्यंत म्हशीवाले काका आले ते सोडवायला. अंजु आली माझी सायकल दोघानी मिळुन उचलली. अंगाला असह्य वेदना होत होत्या. शाळेचा ड्रेस चिखलाने भरलेला. सायकलचे चाक वाकडे झालेले. घर ३ मिनिटावर होते पण ह्या प्रकारात आधीच ७ मिनिटे वाया गेलेली. परीक्षेची जाणीव झाली आणि मग तसाच आमचा मोर्चा शाळेकडे वळवला. १० मिनिटे उशिर झाला, नुकतीच प्रार्थना संपलेली पण पेपर सुरु नव्हता झालेला. मुख्याध्यापकाना सगळे सांगितले आणि पेपर ला गेले. दुपारच्या सुट्टीत उजळणी करण्याऐवजी माझ्यावर उद्भवलेल्या प्रसंगाची उजळणी, शहानीशा आणि उहापोह वगैरे झाला. टिंगल टवाळी न करतील त्या कन्याशाळेतल्या १०वी अ च्या विद्यार्थीनी कसल्या ....

अशी झालेली ती अविस्मरणीय भेट आज तुमच्या भेटिला आणलीय.

Wednesday, May 10, 2006

भाकरीचा चंद्र

मी ५ वी किंवा ६ वी मधे असतानाची गोष्ट. मम्मी पुण्याला काकुकडे गेलेली १ महिना कारण तिला बरे नव्हते. आमच्यासाठी डबा गावात रहाणारी मामी पाठवेल असे ठरलेले. पण मामीला काही ना काही कारणाने डबा पाठवायला नेहेमी उशीर. मग पप्पांचे भातचे प्रयोग चालायचे. नाहीतर मग शेजारी रहाणारी मम्मीची मैत्रीण काहितरी पाठवुन द्यायची.
मम्मी परत आल्यावर तिला हे समजल्यावर मग काय तिने मला स्वयंपाक शिकवायचे जे काय मनात घेतले कि बासच. भाजीसाठी कांदा चिरुन देणे, भाजी निवडुन/चिरुन देणे ह्या गोष्टी आठवड्यातुन २-३ वेळा तरी कराव्याच लागायच्या. मग ते नीट जमायला लागले, आणि मग भाज्या फोडणी पण द्यायला यायला लागल्या. तोपर्यन्त आली उन्हाळ्याची सुट्टी.

मग मातोश्रीनी आम्हाला भाकरी शिकवायचे मनावर घेतले. आधी स्वत: भाकरी करत असताना त्यातला शेवटचा गोळा मला ठेवुन त्याच्यावर प्रयोग. मातोश्री एक्दम कडक शिस्तिच्या आणि घरात भाकरी अगदी पातळ पातळ करायची सवय असल्याने प्रचंड शाब्दिक मारामारी व्हायची. मग गंगा, यमुना सरस्वती यांचा संगम अस्मादिकांच्या चेहेर्यावर व्हायचा. असे करत करत १०-१२ दिवसानी एकदा कधीतरी भाकरी बरी थापली गेली - आकार होता कसा बसा ४-५ इंच व्यासाइतका. एकदम आनंदाचे उधाण वगैरे जे काही असेल ते आले. मग मातोश्रींच्या कडक शिस्तीखाली तो रोट (हो रोटच होता तो) भाजायचा प्रयोग झाला. हे करता करता काही दिवसात बर्यापैकी पातळ आणि कशाबशा फ़ुगणार्या भाकऱ्या तयार व्हायला लागल्या.
तष्यात कधितरी मग मम्मीला बाहेर कुठेतरी अचानक जावे लागले आणि मग अस्मादिकान्ची नेमणुक झाली भाकरी करण्याच्या कमगिरीवर. मग बाहेर जाताना मम्मीने मग १७६० सुचना दिल्या आणि ती गेली बाहेर. मग काय भावाबरोबर मस्ती झाली, भांडण झाले बराच काय काय उद्योग करुन झाला आणि मग लक्शात आले की भाकर्या राहिल्याच की करायच्या !! मग काय पटापट तयारी केली आणि बसले भाकर्या करायला. पहीली भाकरी थापुन तव्यावर टाकली पाणी लावले आणि दुसरी करायला घेतली. ती करुन तव्याकडे बघते तर तव्यातल्या भाकरीला असंख्य भेगा पडलेल्या. तरी दामटुन ती उलटली आणि थोडावेळ भाजुन मग तवा काढुन आचेवर भाकरी टाकली आणि आता फ़ुगेल मग फ़ुगेल असे वाटले. थोड्यावेळात त्याअतुन धुर यायला लागला. मग तई कोळसा झालेली, भेगा पडलेली भाकरी काढुन बाजुला ठेवली आणि परातीतली भाकरी तव्यात टाकली. मग ठरवले की ही भाकरी पूर्ण झाल्याशिवाय पुढची करायचीच नाही. मग ती भाकरी उलटताना मधेच तुटली - ती कशीबशी सांधवली. त्या भाकरीचे पण फुगायचे काही लक्शण दिसेना मग ती पण ठेवली टोपलीत काढुन. मग पुढची थापायला घेतली तर थापयलच जमेना. मग मोडुन परत करुन तिला तव्यावर टाकली तर तोपर्यन्त तवा इतका तापलेला की तिला अचानक फ़ुगे फ़ुगे आले. कशीबशी शेवटच्या टप्यापर्यंत नेली तिला पण तिनेही फ़ुगायचे नाकारले. मग परत गंगा यमुना सरस्वती आल्या धावुन संगमासाठी. पण कसचे काय त्या मदत थोड्याच करणार होत्या मला. फ़क्त साथ देणार होत्या. तेवढ्यात डोक्यात आयडीयेची कल्पना आली - सगळ्या भाकर्या उचलल्या आणि घरामागे असलेल्या उसाच्या शेतात टाकुन पटकन पुढची भाकरी करायला घेतली. ती जरा बरी झाली. तोपर्यंत लैलाच्या आई, ज्या अमच्याकडे भांडी धुणी करायच्या त्या आल्या. मग त्यांच्या देखरेखीखाली उरलेल्या भाकर्या बर्यापैकी झाल्या. त्यादिवशी ८-९ भाकरी करायला मला जवळपास २ तास लागले आणि त्यातल्या ३ तर शेताला दान गेल्या.
त्या आठवड्यात मम्मीला परत कामासाठी कुठेतरी जावे लागले त्यावेळी पण वरची जवळपास सगळ्या क़ृतीची उजळणी झाली. शेताला २ भाकर्या अर्पण करण्यात आल्या. असे करत करत शेतला एकुण ८-९ भाकर्यादन गेल्या त्या आठवड्यात!
हे सांगणे न लगे की मम्मीला त्या आठवड्यात २ दिवस लवकरच दळण करवे लागले...