Friday, November 09, 2007

रेशमाच्या रेघानी ...

रेशमाच्या रेघानी हा माझा लेख मायबोली दिवाळी अंक 2007 मधे प्रकाशित झाला.

Thursday, October 04, 2007

जे जे उत्तम ...

नंदनने लिहायला चालु केले आणि आगावुपणाने लग्गेच सांगितले की टॅग का चालु करत नाही? मला अजीबात वाटले नव्हते की तो मनावर घेईल ;) पण तो नंदन आहे हे विसरले! आज स्वाती परत टॅग केले आणि अजुन लोकानी आठवण करुन द्यायच्या आत लिहावे म्हणुन बसले आणि आवडणारी सगळी पुस्तके समोर काढली आणि हे लिहु का ते असे काहीसे झाले.
नंदन ने हा उपक्रम सुरु करण्यासाठी ’पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम. अर्थात मागचा-पुढचा संदर्भ जरी नसला, तरी तो तितका उतारा वाचनीय वाटावा इतपत उद्धृत करण्याचा प्रयत्न करेन.’ असे साधे सोपे समीकरण देउनही ते आता कठीण वाटतेय :)


माझ्या अत्यंत आवडत्या उता-यांपैकी खालील एक उतारा -
धबधब्याजवळ पोचल्यावर अम्हाला काय करावं आणि काय नाही तेच समजेना इतका आनंद झाला होता. कोण पाणी उडवायला लागला कोण पाण्यात पळायला लागला. टुकण्या पाण्यातच बसुन राहीला. त्याने शर्ट काढुन टाकला होता. कणब्या रंगीत दगड गोळा करत होता. मुली फुले गोळा करत होत्या. मास्तरांनी कोट, टोपी काढुन धोतराचा काचा मारला होता. ते धबधब्यांच्या रांगेत उभे राहुन हसत होते. त्यांच्या डोक्यावरचे काळे कुरळे केस आम्ही पहिल्यांदाच पाहीले. टोपी आणि कोट नसलेले, हसणारे मास्तर आम्हाला आमच्यासारखेच वाटायला लागले. जोरात पाऊस आला तेव्हा ते देवळाकडं पळाले नाहीत. आमच्याबरोबरच भिजत राहिले. मग वेलंगीबाईही धबधब्यांच्या रांगेत येउन उभ्या राहिल्या आणि त्याही हसायला लागल्या. सगळीकडं हिरवंगार होतं. आणि सगळीकडं भरुन राहीलेला वासही हिरव्याच रंगाचा असावा, असं वाटत होतं.

पायाखालुन आणि वरुन वाहाणारं पाणी गुदगुल्या करुन पुढं जात होतं. इकडं तिकडं पळणारी मुलंमुली हळूहळू त्या धबधब्याच्या समोरच आली. आपोआपच आमची एक साखळी तयार झाली. लोखंडीसाखळीसारखी नाही, तर रंगीबेरंगी, वेगळ्या वेगळ्या हसणा-या बोलणा-या आवाजांची साखळी. आम्ही वेगवेगळी मुलं नव्हतोच, तर आम्ही सगळी एकच आहोत, असं मॅड्सारखं वाटत होतं. वाहाणा-या पाण्याच्या विरुद्ध दिशेनं एकमेकांच्या हातात हात घालुन आम्ही कुठतरी निघालो आहोत, असं वाटत होतं. मधेच मॅड्सारखं पिवळंधमक ऊन पडलं. कुठं कुठं भरुन राहीलेलं पाणी अंगठीतल्या खड्यासार्खं चमकायला लागलं. माझ्या डाव्या हातात कुणाचा तरी हात होता. तो थोडासा टोचणारा हात जाउन नवाच कोणता तरी हात आला होता. न पहाताच असं वाटत होतं की हा हात ओळखीचा आहे. मी डावीकडं पाहिलं तर शेजारी सुमी उभी होती. तिनं माझा हात घट्ट पकडला होता. ती माझ्याकडं पाहुन हसत होती. पाण्याचे कितीतरी बारीक थेंब तिच्या केसांत अडकुन राहीले होते. ती माझ्या डोळ्यातच पहात होती. त्या हिरव्या रंगाच्या वासातूनही सुमीच्या केसांतील सोनटक्क्याच्या फुलांचा वास येत होता. खरं तर त्या सर्व हसण्याला आणि ओरडण्याला सोनटक्क्याच्या फुलांचा वासच असावा, असं वाटत होतं. माझ्या डोक्यात असला कही गोंधळ चालू असताना सुमी म्हणाली,
"किती छान आहे ना?"
मी मान हलवली.

-----------
साखळी, ’वनवास’ - प्रकाश नारायण संत

आता मी खालील लोकाना टॅग करते -
संवेद
सुमेधा
प्रियंभाषीणी
कृष्णाकाठ
परागकण

मी शक्यतो अत्तापर्यंत ज्यांना टॅग केले गेले नाही असे लोक शोधायचा प्रयत्न केलाय.

(P.S. सुमेधा आणि संवेद या दोघाना अजुन कोणीतरी तग केल्याचे दिसले. म्हणुन बदलते आहे. नवीन टॅग खालीलप्रमाणे -
शोनू
गायत्री)

Friday, September 14, 2007

गणपती बप्पा मोरया!

गणपतीची तयारी कशी चालु आहे? फुले, दुर्वा, मणीवस्त्र, फुलवाती, साध्या वाती, तेल, तुप, कापुर, निरांजन, आरतीचे पुस्तक (!), प्रसाद, हार सगळी तयारी झाली का? काय? मणीवस्त्र म्हणजे काय? कसे करायचे माहीती नाही. अरेच्चा एवढेच होय१ सोप्पे आहे की ते! येथे टिचकी मरा . अगदी स्टेप बाय स्टेप दिलेय मी.

मग करा बघु बप्पासाठी मणीवस्त्र तयार.

Sunday, September 09, 2007

आई मला शाळेत जाऊ दे ...

सध्या इथे नुकतेच शाळा/कॉलेजेस सुरु झाली आहेत किंवा होत आहेत. सगळ्या दुकानांमधुन Back To School सेल चालु आहेत. निरनिराळ्या प्रकारचे पेन, रंग, वह्या, दप्तरे पाहिले की मला माझी शाळा सुरु होतानाची लगबग आठवते. सगळ्यांनाच होत असेल.
मी जवळपास तीन वर्षांची असल्यापासुन बालवाडीत जात होते कारण आजुबाजुची मुले शाळेत जातात तर मग मी का घरी बसायचे हा हट्ट. मग पप्पा शाळेत जाताना एका लहान बालवाडीत मला सोडुन पुढे कॉलेजला जायचे. ४ वर्षांची असताना बाराखडी, अंक वगैरे सगळे नीट येत होते म्हणुन मग मम्मी पप्पांना वाटले की मी पहील्या इयत्तेसाठी तयार आहे म्हणुन मग मला शाळेत घेऊन गेले. पण वय कमी असल्याने मुख्याध्यापकांनी मला शाळेत दाखल करुन घ्यायला नकार दिला. त्यावेळी मला त्या शाळेत घेत नाहीत म्हणुन पसरलेले भोकाड मला अजुनही आठवते आणि आजुबाजुची जनता अवाक! कारण शाळेत जाताना रडलेली जनता खुप असते आणि शाळेत घेत नाहीत म्हणुन रडणारे आमच्यासारखे शुरवीर खुपच कमी.

शाळेसाठीची खरेदी हा एक त्याकाळी सोहळाच असे कारण सगळ्या गोष्टी अगदी नेहेमीच मिळायच्या असे नाही दप्तरे फ़क्त मे, जुन, जुलै महीन्यातच मिळायची मधे अधे कधी दप्तर फ़ाटले तर तेच दुरुस्त करुन वापरण्याशिवाय गत्यंतर नसायचे. शाळेसाठी नवीन पाटी मिळणार का? ह्यावर्षी तरी मी मम्मीला मोठी झालीय असे वाटुन पेन्सिलच्या ऐवजी पेन मिळणार का? आणि पेन शाईचे न मिळता बॉलपेन मिळेल का असले बालसुलभ प्रश्न कायम खरेदीच्यावेळी डोक्यात. कारण घरात कितीही ’तु म्हणशील ते घेऊ’ असे म्हणलेले मम्मी पप्पा पाटील आणि कंपनी किंवा भालचंद्र स्टोअर्स किंवा रमेश स्टोअर्स मधे गेले की त्यांना जे आवश्यक वाटेल तेच घेउन यायचे आणि मग घरी आल्यावरचे मुसमुसणे, चिडचिड मग त्यावरचे रागावणे अगदी ठरलेले!
अशातच मग तिसरीच्या खरेदीच्या वेळी न मागता मिळालेला चांदीच्या रंगिबेरंगी कागदात गुंडाळलेल्या पाटीवरच्या पेन्सिलीचा अक्खा पुडा किंवा चौथीच्या खरेदीच्या वेळी न मागता मिळालेला कॅमलीनचा संपुर्ण कंपास असे मस्त धक्केही मिळायचे. असे मिळालेले धक्के ही अगदी मग न चुकता दरवर्षी मिळत गेले. कधी मस्त कार्टून्स असलेली ६ इंची पट्टी असेल किंवा मग ०.५ ची मेकॅनिकल पेन्सील असेल किंवा मग १२ रंगांच्या ट्युबचा सेट असेल. पण ते त्यावेळी कधी जाणवायचे नाहीच. आता आठवत रहाते की त्यावेळी शाळेसाठी उपयोगाचे पण जरा महागाचे, सर्वांकडे सहजी नसेल असे काहीतरी नक्की घेतले जायचे.

नविन पुस्तके, वह्या हा तर नवीन शाळेचा अविभाज्य भाग. पप्पा मनापासुन सगळ्या पुस्तकांना कव्हर्स घालुन द्यायचे. पुढे त्यांनी मलाच शिकवल्याने मी पण त्यांच्याच तन्मयतेने ते काम करायचे. आजदेखील मी देशातुन येताना जी पुस्तके आणते त्यांना पप्पा कव्हर्स घालुन देतात! त्यानंतर त्यावर आपल्या ’सुवाच्य’ अक्षरात नाव घालायचे आणि मग शाळेत गेल्यावर सगळ्यांच्या वह्यांवर आई/बाबा/मामा/काका/मोठे बहीण/भाऊ यांनी घातलेली नावे पाहीली की झालेली चिडचीडही आठवते. मला वहीच्या पहील्या पानावर नावाव्यतीरीक्त काही लिहिलेले आवडायचे नाही. आणि शक्यतो शेवटच्या पानावरही गिरगिटु नये असेही वाटायचे. साधारण ९ वी किंवा १० वी मधे असताना माझ्या डोक्यात एक कल्पना आली ती म्हणजे नावाच्या पानावर एक चित्र काढुन ते रंगवायचे. ते पण काम मग मी शाळा सुरु होण्याआधी पूर्ण करत असे. दरवर्षी एक वेगळी थीम घेउन! शेवटच्या पानावरच्या गिरगटण्यावर उपाय नाही सापडला कधी ...

पावसाळी चप्पल आणि छत्री किंवा रेनकोट घेण ही पण एक शाळा सुरु होतानाचीच खरेदी. तसेच नवीन युनिफॉर्म्सची खरेदी पण हा एक आनंदसोहळाच! केस लहान असल्याने रिबीन्स वगैरे घेणे हा भाग नसे. तसेच नविन दप्तर हेही एक प्रकरण असे. मला आवडलेली कुठलीही चप्पल, छत्री किंवा दप्तर फक्त शोभेसाठीच आहे हे मम्मी मला पटवुन देउन ’उपयोगी’ आणि ’टिकावु’ वस्तु घेउन यायची. मग घरी आल्यावर धुसफ़ुस कारण शाळेतल्या ’चांगल्या’ मुली मला नावे ठेवतील ही चिंता!

आता शाळा/कॉलेज संपले. आता ह्या ’Back To School' मधे जाउन मी एखादे नवीन प्रकारचे पेन मिळतेय का पहाते . किंवा Back To School Drive साठी जाऊन एखाद्या गरजु मुलीसाठी सगळी खरेदी अगदी मनसोक्त करुन येते. ती खरेदी अगदी माझ्याचसाठी आहे इतक्या तन्मयतेने फ़िरुन ती खरेदी करुन माझ्या शाळेच्या खरेदीची आठवण ताजी करुन येते.

Thursday, September 06, 2007

बेळगाव की बोळगाव

आज प्रकाश संत यांचे ’पंखा’ वाचत होते खुप दिवसानी. त्यातली भाषा, जागांचे उल्लेख सगळे आहेत ते बेळगावचे. बेळगावशी पहीला संबंध कधी आला माहीत नाही. मला आठवतेय तसे गिरिशकाकांच्या लग्नाला की रिसेप्शनला पहिल्यांदा बेळगावला गेलेले ते आठवते. हे सगळे असले तरी बेळगावचा पहीला ऐकीव उल्लेख आठवतो तो म्हणजे रावसाहेब! पु. ल. नी बेळगावच्या भाषेची एवढी सुंदर नक्कल केलीय की बास. पण ते गाव मनापासुन घर करुन राहीले ते मात्र दोन कारणांसाठी - एक म्हणजे आमचे हरिमंदिर आणि दुसरे म्हणजे आज्जीचे घर. हरिमंदिराविषयी मी पामर काय लिहिणार. तिथे मिळालेली शांती जगात मला अजुन कोठेही अनुभवता आलेली नाही.

आज्जी म्हणजे माझ्या वडीलांची मावशी. बहीण गेल्यावरही तितक्याच आपुलकीने आमच्या सगळ्यांचे लाड करणारी आज्जी. मला आज्जी म्हणले आठवणा~या ४ आज्जीपैकी एक. माझे आजोळ कराडच. त्यामुळे आजोळी जाणे वगैरे अप्रुप आम्हाला कधी चाखायला मिळालेच नाही. त्यातुनही अजोळी बरेच तिढे पडल्याने आज्जी, अजोबा आणि एक मामा यांच्याशिवाय कोणी प्रेमाचे वाटु नये अशी परीस्थीती. त्याच न कळत्या वयात आत्या आणि काकांच्या लग्नासाठी म्हणुन बेळगावला रहायला गेले होते. घरात आम्ही १०-१२ चुलत भावंडांची पलटण होती. त्यात मी सगळ्यात मोठी! त्यावेळी आम्हा भावंडांचे एकमेकांशी नक्की काय नाते आहे हे सांगणेही जमत नसे. टि. व्ही. नव्हता त्यामुळे सतत कसला ना कसला तरी खेळ खेळत आमचा दंगा चालायचा. आजोबांचा होलसेलचा मोठा व्यावार होता आणि त्याचे ऑफीस घरात असल्याने त्याची पण वर्दळ सतत असायची. मराठीची वेगळी ढब आधीपासुन माहीत होती पण तिथे राहिल्यावर आमच्याही भाषेत झालेला फ़रक कधी जाणवला नाही. ’आत्ता हेच जेवुन सोडलो बघा.’ असली वाक्ये ऐकुन हसणारे आम्ही २ दिवसात नकळत पणे तसेच बोलायला लागलेलो. घरात राचोटीअज्जा म्हणुन एक स्वयंपाकी होते खुप वयस्कर. ते अजुशी वगैरे कधीतरी इंग्लिशमधे बोलायचे. ऐकुन मजा वाटायची. घरात निम्मे लोक मराठी आणि निम्मे कानडी त्यामुळे सहज दोन्ही भाषा कळायला लागलेल्या. सकाळी अज्जारी दुकानात जाईपर्यंत जरा घरात शांतता कारण निम्मी पलटण उठलेली नसायची. कधीतरी लवकर उठुन अज्जारींच्याबरोबर दुध घ्यायची वेळ आली की ततपप होणार हे नक्की कारण ते नक्की कुठले तरी मराठी वाक्य ऐकवुन हे म्हणजे काय ते सांग असले काहीकाही सांगत! बेळगावमधे राहुनही आज्जी आणि अज्जारी मराठी नेहेमी वाचत त्याचे त्यावेळी आश्चर्य वाटायचे.
समादेवी गल्ली, मारुती गल्ली, गोंधळी गल्ली, रेडीओ टॉकीज, सन्मान, बिस्कीट महादेव, मिलिटरी महादेव, कित्तुर चन्नम्माचा पुतळा, बाळेकुंद्री ही सगळी ठिकाणे तिथे राहील्याने माहीत झाले. लाल मातीने पांढ~या फॉकचे जे काही नमुने झालेले ते बघुन मम्मी जवळपास बेशुध्दच पडायची राहीलेली. बेळगावला खाल्लेली ओल्या काजुची उसळ, आलेपाक अवल्लक्की, कुंदा अजुनही आठवत रहातो. प्लांचेट हा प्रकार तिथे पहिल्यांदा पाहीला. प्रचंड भीती वाटलेली तेही नीट आठवते.
तिथुन पुढे एक वर्षाआड का होईना बेळ्गावला जात आले आणि ते गाव तिथली माणसे, भाषा यांच्या परत नव्याने प्रेमात पडत आले. त्याच दरम्यान कधीतरी पुलंची रावसाहेबची कॅसेट घरी आणलेली. त्याची पारायणे करताना बेळगावची मिठास सतत वाढत राहीली. परवा डिसेंबरमधे बेळगावला जाउन आले बराच फ़रक झालेला जाणवला. आज्जी अजोबा दोघेही थकले. आज्जारींची पुर्वीइतकी भीती पण वाटत नाही पण आदर मात्र पुर्वीपेक्षा दुपटीने वाढलाय. त्यांच्या कर्तुत्वाचा मोठेपणा आता जास्ती भावतो. चुलत भाऊ बहिणी आता खुप मोठे झालेत तरी तेच प्रेम तीच आपुलकी अजुनची आहे. गाव बदलले बोळही आता राहीले नाहीत पण मातीचा रंग, हवा अज्जिबात बदललेला नाही. अजुनही आज्जी बाजारात तेवढ्याच उत्साहाने जाते पण आता धाकटी चुलत बहीण तिच्या सोबत असते.

गाव बदलत जाईलच, माझे जाणे जसे जमेल तसे जेव्हा जमेल तेव्हा ह्या प्रकारात जाईल पण प्रकाश संतांची पुस्तके आणि पुलंचे रावसहेब मला मी पाहीलेल्या बेळगावची आठवण नक्की करुन देतील.

Wednesday, August 29, 2007

श्रद्धा की अवडंबर?

गेल्यावर्षी भारतात गेले होते त्यावेळी प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे देवळांची वाढणारी संख्या, खुप वेगवेगळ्या महाराजांची नावे, व्याख्याने वगैरेंच्या जाहीराती. प्रत्येक गल्लीत असलेली गणपती मंडळे प्रत्येकाचे वेगळे ऑफीस! अचानक हा बदल कधी झाला? इतके वेगवेगळे साधु अचानक कुठुन आणि कधी आले? त्यांना स्वत:च्या प्राचाराची आवश्यकता का वाटायला लागली. हे सगळे नक्की बदलले कधी.

लोकमान्य टिळकांनी ज्या कारणासाठी गणेशोत्सव चालु केला होता त्याच कारणाने अजुनही चालु ठेवावा असे मला अज्जीबात वाटत नाही पण त्याला आलेले प्रचारकी म्हणा किंवा बाजारु जे स्वरुप आहे ते कोठेतरी खटकते. गल्लोगल्ली असलेली गणेश मंडळे आहेत ती नक्की काय कामे करतात? त्या गल्लीतला गुंडच त्याचा प्रमुख असतो बरेचवेळा. हट्टाने देणग्या ’घेतल्या’ जातात. मोठे मोठे स्पिकर्स आणुन ढणढण गाणी लावायची आणि त्यावर नाचायचे. शेजारी पाजारी वृद्ध लोक असतील लहान बाळे असतील त्याचा काहीही विचारच नाही. ह्या सगळ्यात आपण गणपतीची पुजा करतो म्हणजे काय करतो, कशासाठी करतो ह्याचा सारासार विचार तरी केला जातो की नाही माहीत नाही. ह्या मंडळांचे जे कोणी कार्यकर्ते असतात त्यांना नोक~या, शाळा, कॉलेजेस वगैरे तरी असतात की नाही हे तो गणपतीबप्पाच जाणे!

एकुणच सगळ्याला खुप बाजारु स्वरुप आलेय. सगळ्या नवीन ’साधु-संताना’ आपल्या प्रवचनांच्या पानपान भरुन जाहीराती कराव्या लागतात. कित्येकांच्या अंगावर प्रचंड दागदागीने, भरजरी साड्या वगैरे दिसतात. पुर्वीचे संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, अक्कलकोट महाराज, वगैरे जे होऊन गेले त्यांचा साधेपणा हाच त्यांचा दागीना वाटायचा. हे कधी आणि कसे बदलले? खरोखर विचार करायला लावणारी गोष्ट आहे. कित्येक रुपये खर्च करुन लोक तिरुपतीला जातात तिथे ताटकळत उभे रहातात अक्षरशः १ मिनीटापुरते दर्शन मिळते त्यासाठी इतका अट्टाहास का? जी गोष्ट बालाजीची तिच गोष्ट कोल्हापुरच्या अंबाबाईची. गेले ३-४ वर्षे मी कोल्हापुरला जाऊन देवळात गेले नाहीये का? तर इतकी गर्दी आणि चो~या मा~या हेच नित्याचे. लोक खरोखर अचानक इतके देवभक्त झाले का? कळत नाही. गेल्यावर्षी तिरुपतीप्रमाणे पंढरपूरला देखील पैसे देवुन लगेच दर्शन मिळण्याची वेगळी रांग चालु केली होती अजुनही आहे की नाही माहीती नाही. पण वारीबरोबर येणारे भक्तगण तिष्ठत त्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी उन्हा-पावसाचे ताटकळत उभे असताना कोणी धनवंत फक्त धनाच्याच बळावर स्वत:च्या गाडीतुन येउन दर्शन घेउन जाणार हे चित्र प्रचंड संतापदाय़ी आहे.

माझा देवावर विश्वास आहे. तोच माझा पाठीराखा आहे ह्याबद्दल माझी खात्री देखील आहे. पण त्याचे हे असले अवडंबर झालेले मनाला पटतच नाही. हे कुठेतरी बदलले पाहीजे. बदलण्यासाठी एखाद्या लोकमान्यांची, फुले, अंबेडकरांचीच आज आपल्या समाजाला गरज आहे.

(ही माझी वैयक्तीक मते आहेत त्याचा कृपया अन्य गोष्टीशी संबंध लावु नये ही विनंती)

Tuesday, August 28, 2007

ऐलतीर-पैलतीर

दोन आठवड्यापुर्वी मिशन पीक ला जाण्याचा पराक्रम केला आणि येताना उतारावर दगडांवरुन पाय सटकुन पडले इतके की ९११ ल फोन करुन त्यांच्या मदतीने राहीलेले अंतर खाली यावे लागले. ते पडणे इतके मोठे निघाले की आता पायाला ६ आठवडे प्लास्टर घालुन बसणे एवढाच उपाय होता. तर सध्या अस्मादीक कुबड्या घेउन कसे चालावे ह्याचे प्रशिक्षण घेत आहेत!

घरी (म्हणजे देशात) रोजचे फोन चालु आहेत. इथे मला मदतीला कोणी नाही म्हणुन घरचे हळहळताहेत आणि त्यांची आठवण येउन माझ्या डोळ्यातले पाणी ओसरत नाहीये. इथे रहाताना घरच्यांची आठवण न होता दिवस पुढे सरकत नाहीत
आणि तिथे गेले की इथल्या काळज्या मनातुन जात नाहीत. एकुण हे द्वंद्व प्रत्येक परदेशस्थ भारतीयाच्या मनात चालु असते. तिकडुन मदतीला लगेचच कोणी येउ शकेल ही परीस्थीती नाहीये. इथल्या मैत्रीणी आपापल्या भागादौडीने थकलेल्या! मला येउन मदत करण्याची त्यांची कितीही इच्छा असेल तरीही ते शक्य होत नाही. ह्या सगळ्या परीस्थीतीमधे ’आपण भारतात असतो तर’ हा विचार उचल खातो. देशात असते तर घरुन कोणीही निश्चीत आले असते मदतीला हे नक्कीच कारण पासपोर्ट, व्हीसा, थंडी, भाषा असल्या गोष्टीचा त्रास नसता झाला. आले मनात की तिकीट काढुन आले इतके ते सोपे होते. डॉक्टरशी समोरासमोर बसुन पाहीजे तितके प्रश्ण विचारता आले असते. रात्री-अपरात्री गरज लागली तर कदाचीत डॊक्टरने फोन उचलुन मदतही केली असती. येवढ्या सगळ्या जमेच्या बाजु आहेत! मग आपण इथे काय करतोय? कशासाठी इथे रहातो? पैसा? मान-मरातब? सुखसोयी? पैसा आहे पण रोजचे घरचे काम आपले आपणच करावे लागते. अगदी कितीही कंटाळा आला तरी भांडी घासणे, केर, स्वयंपाक हे सगळे आपले आपणच बघावे लागते. भाजीपाला, किराणा सामान आपले आपणच घरात आणावे लागते.
पण हवेचे प्रदुषण, आवाजाचे प्रदुषण नाही. शनिवार रविवार सुट्टी अपल्याला आवडते ते शिकण्यात घालवता येते. शिक्षण पुढे चालु ठेवता येते. मुलांसाठी सुसज्ज पाळणाघरे आहेत आणि तिथे मुलांची आबाळ होणार नाही ह्याची खात्री असते. जात-पात, धर्माच्या नावावर चालणारे दंगे नाहीत. रोजच्या व्यवहारात तुम्हाला तुमच्या जातीचा दाखला द्यावा लागत नाही. सामाजीक समानता जाणवते. तुमच्या उत्पन्नाच्या प्रमाणात तुम्हाला आयकर द्यावाच लागतो. एखाद्या कागदपत्रासठी उगीचच अडवणुक केली जात नाही. रस्ते, पाणी, वीज, वहातुक ह्यासारख्या रोजच्या गरजांसाठी धावपळ करावी लागत नाही.

एकीकडे राहीले तर घरचे सगळे जवळ आहेत पण रोजच्या जगण्यासठी कराव्या लागणा~या लढाईत आपण जगणेच विसरुन जाउ की काय अशी भीती आहे. दुसरीकडे सुसज्ज सोयीनी जगताना घरच्यांपासुन, आपल्या देशापासुन, आपल्या मुळांपासुन फ़ारकत घेतोय की काय अशी भीती आहे.

ऐलतीरी राहायचे की पैलतीरी हया प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार, परीस्थीतीनुसार, घ्यायचे असते, घेतलेलेही असते.

Wednesday, July 18, 2007

अविनाश धर्माधिकारी

गेल्या शनिवारी अविनाश धर्माधिकारी यांचे भाषण ऐकण्याचा योग आला. त्यांचा हा बे एरीया मधला तिसरा कार्यक्रम आणि मला हे तिनही कार्यक्रम पहायचा आणि ऐकायचा योग आला. मला हा कार्यक्रम तितकासा आवडला नाही कारण नसलेले नाविन्य! आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रामात दिसणा~या सर्व चुका परत एकदा दिसल्या. जवळपास ३०% लोक लहान मुलाना घेऊन आले होते आणि त्यांची रडगाणी सतत चालु होती आणि आईवडीलांजवळ थोडीसुद्धा courtsey नव्हती की आपल्यामुळे लोकाना त्रास होतोय तर बाहेर घेउन जावे. महाराष्ट्र मंडळाची निवेदिका बोलताना आपण घरगुती गप्पा मारतोय ह्या पद्धतीने निवेदन करत होती. शेवटी म.मं.च्या नेहेमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी ह्यावर्षीच्या सगळ्या कार्यक्रमांची जाहीरात करुन घेतली!

आता थोडे भाषणाविषयी! धर्माधीकारींचे स्वत:चे कार्य, व्यक्तीमत्व इतके मोठे आहे की त्याविषयी कधीही ऐकायला कंटाळा येत नाही. पण हा कार्यक्रम न आवडण्याचे मुख्य कारण असे की जाहीरात करताना २०२० चा भारत अशी केली होती आणि त्याबद्दल एकही वाक्य ते बोलले नाहीत. त्यांना न विचारताच कार्यक्रमाचे नाव जाहीर केले होते की काय अशी शंका आली. सुरुवात करताना त्यांनि असे जाहीर केले होते की शेवटी चर्चेसाठी वेळ राखून ठेवण्यात येईल पण तेवढा वेळच पुरला नाही. शेवटी ३ लोकानी चाणक्य मंडळाच्या कार्याबद्दल सांगण्याचे प्रयोजन काय हे कळले नाही. ते जे बोलले त्यातले मला जवळपास ४०% आधीच्या भाषणांमुळे, त्यांच्याबद्दल इतर कुठे वाचल्यामुळे माहीती होते. परत ऐकण्यात स्वारस्य नव्हते असे नाही पण नवीन ऐकायला जास्त आवडले असते. या माणसाचे कार्य प्रचंड आहे आणि आधी केले मग सांगीतले असे असल्याने प्रभाव जस्ती पडतो हे पण तितकेच खरे. स्वत:च्या कामावर त्यांचा प्रचंड विश्वास आहे आणि स्वत:चे कठोर परीक्षण करण्याची बुद्धी आहे. ३ वर्षांपुर्वी ते आलेले असताना त्यांनी भारताचा स्वयंपूर्णतेकडे होणारा प्रवास उदाहरणे देउन सांगितलेले आठवतेय. त्यापद्धतीने ते बोलले असते तर ते जास्त सयुक्तीक ठरले असते. हे भाषण आनंद निश्चीत देउन गेले, दुपारी घरी डुलक्या घेण्यापेक्षा काहीतरी चांगले ऐकल्याचे समाधान मिळाले. आणि इतर देशातुन येणा~या वक्त्यांपेक्षा त्यांचा ’तुम्ही इथे राहुनही आपल्या देशासाठी काहीतरी करु शकता’ हा दिलासादायक सुर पण आवडला. आणि इथे रहातो म्हणुन खिल्ली उडवणे, इथे येउन फ़क्त मदतीची अपेक्षा न करणे हेही वेगळे जाणावले.

शेवटी बाहेर पडल्यावर जाणवलेले आणि अजुनही सतत जाणवत रहाते ते म्हणजे ह्या माणसाची दुर्दम्य इच्छाशक्ती, आपल्या देशाबद्दलची श्रद्धा, देश एक महासत्ता होऊ शकेल हे स्वप्न उराशी बाळगुन आपण त्यादृष्टीने काय करु शकतो ह्याची जाणीव करुन देणारा प्रचंड आशावाद, कार्यकर्ता कसा असावा ह्याबद्दलची स्पष्ट आणि पडखर मते. आपल्या कार्याबद्दलची आत्मीयता आणि तळमळ. या आणि कदाचीत फ़क्त याच कारणांसाठी कदाचीत मी कित्येकवेळा हा कार्यक्रम पहायला-ऐकायला जाईन.

Friday, June 29, 2007

पत्ते, कॅरम, सुट्टी ...

मी साधारण ३री मधे असताना १ रुपायाचा ठोकळा नवीन निघाला होता. प्रत्येकवेळी सुट्ट्या पैशांबरोबर तो मिळाला की आम्ही एका डब्ब्यात साठवुन ठेवत असु. तेव्हा मधेच कधीतरी पुण्याला गेलो तेव्हा अजु-गौरीचा छोटासा कॅरमबोर्ड पाहीला आणि मला पण तो आपल्याकडे असावा असे वाटले. पण मम्मी-पप्पा एवढा छोटा बोर्ड घ्यायला तयार नव्हते. तरी माझा हट्ट चालुच होता. मग एकदा कधीतरी दुकानात गेलो असताना पप्पाना हवा तसा मोठा कॅरमबोर्ड मिळाला तर तो बाजुला ठेवायला सांगुन मग घरी गेलो आणि त्या डब्ब्यात साठलेले पैसे मोजले ते पुरेसे असावेत बहुतेक. आम्ही संध्याकाळी परत जाउन तो नवा कोरा बोर्ड घरी घेउन आलो. पण तो खुप मोठा होता म्हणुन मग मी खुप चिडचीड केलेली आठवते. त्या घराजवळ दुपारी खेळायला थोडीफ़ार मुले होती पण मम्मी खुपवेळ उन्हात खेळु द्यायची नाही. मग घरीच सुबोधबरोबर कॅरम खेळायचे. तो खुप रडारड करायचा, पण पर्याय नसे!!!
तेव्हा मी मात्र रात्रीची अगदी आतुरतेने वाट पहायचे. टीव्ही नव्हता त्यामुळे मग रेडीओवरची नाटके, गाणी काहीतरी ऐकत मम्मी पप्पा आमच्या दोघांबरोबर कॅरम खेळायचे. पप्पांना पण उत्साह असायचा खेळायचा. मी आणि पप्पा एकत्र, सुबोध आणि मम्मी. मजा यायची. सुरुवातीला मला आणि सुबोधला नीट जमावे म्हणुन मग दोन्ही हाताने खेळायला परवानगी असायची. तसेच अंगठा पण वापरु शकत असु. पण मम्मी पप्पा मात्र फ़क्त उजव्या हाताने खेळायचे. आमची मम्मी कॅरम डबल्सची कॉलेजची चॅम्पियन होती. आणि पप्पा होस्टेलमधे नेहेमी खेळत त्यामुळे त्यांना सवय होती. पप्पांचे रेबाउंड्स तर एकसे बढकर एक असायचे. हे बघत बघत खुप शिकता यायचे. मग सुबोधबरोबर दुपारी प्रॅक्टीस पण करायचे मी कधीतरी. मधुनच कधी माने काका आणि काकु रात्री एखादा डाव टाकायला यायचे. मग त्यांचा खेळ बघत बघत दिवाणवर झोपी गेलेले पण आठवते. पूर्ण उन्हाळ्याच्या सुट्टीभर असे रात्री खेळत बसलेले आठवते.

पुढे कधीतरी असेच मे महीन्यात समोरच्या घरात रहाणा~या मुली पत्ते खेळायला येते का म्हणुन बोलावयला आल्या. तेव्हा मला पत्त्यांचे घर करतात, आणि त्यात ४ प्रकारची पाने असतात ह्यापेक्षा अधिक काहीही माही नव्हती. तेव्हा पण पप्पांनी बाजारात जाउन पत्यांचे २ कॅट विकत आणुन आम्हाला शिकवायला सुरुवात केली. पहील्यांदा भिकार-सावकार पासुन सुरु झाले. मी आणि पप्पा एकत्र आणि मम्मी आणि सुबोध एकत्र असे करुन ७-८ खेळायचो. आम्ही दोघे मग दुपारी प्रॅक्टीस म्हणुन खेळायचो. भरपुर भांडण आणि मम्मीचे डोके खाउन दुपारभर दंगाच दंगा. पुढे कधीतरी त्या खेळांचा कंटाळा यायला लागला असावा. मग आम्हाला रमी कसे खेळायचे याचे शिक्षण सुरु झाले. पहील्यांदा ७ पानानी खेळायला सुरुवात कारण १३ पाने हातात मावायची नाहीत. मग सिक्वेन्स कसा लावायचा, प्युअर सिक्वेन्स कुठला असे सगळे शिक्षण सुरु झाले. कोल्हापुरला म्हणे मी अगदी लहान असताना अण्णा, आजी, अज्जारी, मम्मी, पप्पा, बाबा, डॅडी, वगैरे सगळे बसुन रात्री रमी खेळायचे. कारण तोच एक खेळ सगळ्यानी मजा करत खेळता यायचा. त्यामुळे तो पण घरात जिव्हाळ्याचा विषय होता. सगळ्या जुन्या गोष्टी ऐकत खेळायचो. त्यावर्षीपासुन मग एक दिवस पत्ते, एक दिवस कॅरम असे खेळ चालायचे रात्री.
मग एकदा सुट्टीला बेळगावला गेले तेव्हा मात्र झब्बु, लॅडीस, नॉट-ऍट-होम असले तुफ़ान प्रकरणे शिकुन आम्ही परतलो होतो. आणि तेव्हा सगळी चुलत भावंडे एकमेकांशी इतके भांडायचो पत्याच्या खेळावरुन की एकदा आत्याने रागवुन घरातले सगळे कॅट चुलीत भिरकावलेले होते. तरी आमच्याकडे दुसरेदिवशी परत पत्ते बघुन घरच्यानी फ़क्त डोक्याला हात मारला होता!
पुढे कधीतरी अजु सुट्टीसाठी कराडला यायचा. तोपर्यंत पप्पा थोडेफार कंटाळलेले असायचे खेळायला. कारण त्यांना वाचन करायचे असायचे. मग आम्ही त्यांना वाचन करायला सोडुन वर गच्चीवर जायचो. रम्मी तोपर्यंत फार बोअरींग वाटायला लागली होती कारण लॅडिसची गोडी लागलेली. मग ३२ कळ्या=१ लाडू, वक्खय, हुकुम असली प्रकरणे म्हणजे धमाल! रात्री १२ वाजेपर्यंत आम्ही धुमाकुळ घालयचो. कधीतरी आवाज खुप मोठा झाला की मग पप्पा ओरडायचे बास आता झोपा! की आम्ही तेवढ्यापुरते शांत आणि मग परत ये रे माझ्या मागल्या! मग सकाळी उठुन परत एकदा ओरडा खायचा! पप्पा कॉलेजला गेले की मग अंजु, माणिक वगैरे यायचे मग परत आमचे पत्त्याचे डाव बसायचे. माणिक खुप चीटींग करायची मग सुबोध आणि तिची भांडणे! तो १० वर्षाचा आणि ती २५ - बघायाला प्रचंड मजा यायची.
हे आमचे पत्त्यांचे, कॅरमचे वेड साधारण मी १२ वी मधे जाईपर्यंत होतेच. दर सुट्टीमधे पत्ते बाहेर यायचे कपाटातुन. दारामागुन कॅरम बाहेर निघायचा. दुपारी रात्री डाव बसायचे. १२ वी नंतर परीक्षाच जुनमधे संपायच्या. आम्हाला सुट्ट्या लागेपर्यंत बाकी सगळ्यांच्या शाळा सुरु. तोपर्यंत टीव्हीची पण चटक लागलेली असल्याने रात्रीचे डाव पण बंद झलेले.

परवा ऋचाबरोबर उनो खेळताना मला माझ्या लहानपणीची आठवण आली. पत्ते खेळताना केलेला दंगा, भांडणे आठवली. चटकन डोळ्यात पाणी आले. आता तशा सुट्ट्याही मिळणार नाहीत आणि मिळाल्यातरी बाकीची सगळी कामे सोडुन पत्ते खेळणे होणारही नाही!

Saturday, June 23, 2007

कुर्म्याची गोष्ट

मी M. Sc. ला दुस~या वर्षाला असतानाची गोष्ट. आम्हाला आमच्या सिनिअर मुलीनी पन्हाळा इथे नेउन welcome पार्टी दिलेली. त्यामुळे आम्हाला पण त्यांना going away पार्टी द्यायची होती. त्या ६ मुली होत्या आम्ही १८!! त्या सहा मुलीनी सगळे व्यवस्थीत organize केले होते. आम्ही अगदी उत्साहाने कुर्मा भाजी आणि पुरी करायची असे ठरवले. लोकल मुलीनी पु~या करुन आणायच्या आणि होस्टेलच्या मुलीनी कुर्मा भाजी करायची असेही ठरले. रेसीपी बहाद्दर मी. स्वयंपाकाची सवय असलेल्या म्हणजे मी, वंदना, शारदा आणि थोडीफ़ार स्वाती! शुक्रवारी रात्री जाउन राजारामपुरीमधुन भाजी आणायची आणि शनीवारी सकाळी लवकर उठुन भाजी करायची ठरले.
संध्याकाळी भाजी आणायला गेलो तर पिशवी कमी पडली. त्याकाळी भाजीवाले प्लास्टीकच्या पिशव्या देत असत. तर आम्ही भाजी घेतली आणि पिशवी दे म्हणले तर म्हणे आठ आणे पडतील. थोडी घासाघीस केली तरी ऐकायला तयर नाही. मग वंदना म्हणे ए तुझी ओढणी आहे ना चल त्यात बांधुन नेऊ! मी आणि भाजीवाला दोघेही आवाक! तिने खरोखर माझी ओढणी घेउन त्यात टोमॅटो बांधले. दुस~या कोप~यात कोथींबीर, खोबर्याचे तुकडे बांधले आणि चलत होस्टेल गाठले.
सकाळी उठुन सामान काढले आणि लक्षात आले की रूममधल्या स्टोववर हे प्रकरण होणार नाही. मग अंजुला थोडी गळ घातली कारण ती त्यावेळी मेसची मॅनेजर होती. तिने मामाना जाउन सांगितले. मामानी आपल्या तारस्वरात किंचाळुन काय काय सुचना केल्या. कांदा वगैरे कापलेले होतेच. मेसचा तो भलामोठा गॅस सुरु करुन त्यावर ती अवाढव्य कढई तापायला ठेवली. तेल घातले ते त्यात दिसेचना. मामा हसायला लागले. म्हणे एवढ्याश्या तेलाने काय होणार मग त्यांनी त्यात तेल घातले. त्यात कांदा घालुन मी ते मोठ्या उलतण्याने भाजायला घेतले. मी आणि शारदाने ते करायचे असे ठरले होते. तेवढ्यात तिला नवरोबाचा फोन आला! आमच्या लक्षात आले ही काय आता कमीतकमी अर्धातास तरी येत नाही. मग वंदना आली मदतीला. स्वाती आणि वैशाली राहीलेले बटाटे वगैरे कापायला सुरुवात केली. मसाला भाजुन झाला आणि लक्षात आले मेस मधे मिक्सर नाही!!! मग आमची तंतरली. आता एवढा घाट घातलेला त्याचे काय करायचे. मामा म्हणाले पाटा आणि वरवंटा आहे तो घेउन करा सुरु. मी कधी ते वापरले नसले तरी करावे लागणारच होते. परत वंदना आली मदतीला. तिला पाट्याची खुप सवय होती. मग तिने थोडे आणि मी थोडे असे करत मसाला वाटला. मग पुढचे काम सोपे होते. असे करत साधारण २ तासानी आमचा कुर्मा तयार झाला. मामा बघायला आले तर एकदम खुष! कारण त्यांना वाटत होते आम्ही सगळे अर्धवट टाकुन गायब होऊ म्हणुन. आम्ही सगळे मोठ्या भांड्यात केले म्हणुन कुर्मा पण खुप झालेला. मग मामाना थोडा चवीला ठेवला, अंजु, सुरेखा आणि विभावरीसाठी थोडा काढुन ठेवला. तयार होऊन बसलो तर भुक लागली. लोकल मुली आल्या नव्हत्या. सिनीअर पण अजुन आल्या नव्हत्या. मग काय मामांना सांगुन ४ चपात्या आणल्या आणि मस्त पैकी त्या मेहेतीने केलेल्या कुर्म्याचा आस्वाद घेतला!! जेव्हा बाकीच्या गॅंगला कळले की आम्ही इतक्या मेहेतीने केलेय सगळे तेव्हा त्या सगळ्यांनी पण तितक्याच झपाट्याने फडशा पाडला.

परवा cruise वर भारतीय मेनु मधे कुर्मा केलाय असे जेव्हा शेफ आदित्य ने सांगीतले तेव्हा मला आमच्या कुर्म्याची आठवण आली कित्येक वर्षानी.

Wednesday, May 02, 2007

संथ वाहते कृष्णामाई

नदीचा आणि माझा पहिला संबंध कधी आला माहीत नाही. पण मला आठवते ते कोयना नदीमधे सुरेखा कपडे धुवायला गेली असताना तिच्या पाठीपाठी मी मम्मीला न सांगता गेलेले आणि घरी आल्यावर बराच ओरडा खाल्ला होता ते!
कराड कोयना-कृष्णेच्या प्रीतीसंगमासाठी प्रसिद्ध असल्याने नदीशी ओळख होणे अटळच होते. कृष्णा नदीशी ओळख सुरुवातीला फक्त घाटावर जाउन भेळ खाणे, जत्रेत जाऊन फ़ुगे आणणे या प्रकारातुन झाली. त्यामानाने कोयनानदी आपली वाटायची, अजुनही वाटते. त्याला मुख्य कारण म्हणजे कोयनेच्या धरणावर आमचे आण्णा इंजिनीअर होते त्यामुळे पप्पा, काका वगैरेंचे लहानपण कोयनानगरमधेच झालेले. त्यांच्याकडुन अनेक कथा ऐकुन नदी नीटच माहीत झालेली. मम्मी पण हेळवाक, कोयनानगर भागातली असल्याने तिच्याकडुन पण खुपच ऐकलेले नदीबद्दल, धरणाबद्दल. ही खळाळती कोयना! अगदी अल्लड मुलीसारखी!
लहान असताना ११ डिसेंबरला आज्जीबरोबर कोयनेला जाउन आत्याच्या समाधीला जायचो तेव्हा अत्तार अजोबांच्याबरोबर नेहेमी नदीवरुन पाणी आणलेले आठवते. तो दिवस नेहेमीच लक्षात राहील ...
कराडला आम्ही आज्जीच्या घरचा गणपती नेहेमी कोयनेमध्येच विसर्जीत करायचो. पाण्याचा स्पर्ष हवाहवासा वाटायचा. पावसाळ्याच्या दिवसात नदीला पाणी आले की दत्तमंदिराच्या मागे डोह आहे तिथे लोक वाहुन जातात वगैरे आठवते त्यामुळे दत्ताच्या देवळात जायला खुप भिती वाटायची. आम्ही जेव्हा शनिवारपेठेमधे रहात होतो तेव्हा कोयना अगदी माघेच होती. नळाला पाणी नसले की सुरेखा कपडे धुवायला नेहेमी नदीवर जायची. नदीला खुप पाणी असायचे त्या भागात. कडेला दगडावर उभे राहीले की मस्त चकाकताना दिसे. पण पाण्यात जायचे धाडस होत नसे. बरोबरची मुले सहजी पाण्यात जाऊन मस्ती करत पण माझे कधी धाडसच होत नसे.

कृष्णा नदीला पूर येणार अशा बातम्या यायला लागल्या की कॉलेजभागात रहाणा~या मुलीनाघरी सोडत असत. पण आम्ही कॉलेज्च्यामागे रहायला गेलो आणि शाळेत असताना पुर कधी आलाच नाही त्यामुळे अर्ध्या शाळेतुन घरी कधी यायला मिळाले नाही. कॉलेजमधे असताना मात्र २-३ वेळा पुर अला पण कॉलेजला जावेच लागले!! नशीब नशीब म्हणतात ते हेच बहुदा!

आमच्या गावाजवळ खोडशीचे कृष्णेवर बांधलेले एक धरण आहे. धरणाच्या सैदापुरच्या भागात एक रेणुकामातेचे मंदीर आहे. त्यादेवीची पौष महीन्यात यात्रा असते त्यामुळे आम्ही डबे बांधुन घेउन तिकडे जात असु. देवदर्शन करुन नदीकाठाला बसुन डबे खायचे, मस्त अंताक्षरी खेळायची, पाण्यात खेळायचे आणि संध्याकाळी परत यायचे. तिथे पण धरणाच्या मागच्या तलावातल्या पाण्याचा आठवतो. त्यात खेळायला नाही मिळायचे. सैदापुरमधुन खोडशीला लोक सहजी धरणाच्या भिंतीवरुन चालत जात त्याचे अप्रुप वाटे. एकदा आम्ही मुली मुली लांबच्या रस्त्याने कुठे रेणुकेला जायचे म्हणुन गावातुन नदीमधुन आलेलो. येताना आपण खुप मोठे धाडस करतोय असे वाटलेले अगदी पण घरी जाउन प्रत्येकीने ओरडा खाल्याचे दुसरे दिवशी समजले! इथली ती शांत कृष्णा अगदी मोठ्या मुलीसारखी. वाईला पाहीलेला कृष्णेचा शांतपणा अधोरेखीत करणारी...

घाटावर जाऊन कृष्णा-कोयनेचा संगम बघायला आवडायचा. पुढे महाबळेश्ररला सहलीला गेल्यावर त्यांचा उगम बघीतला. या दोघी बहीणी एकेठिकाणी उगम पाऊन वेगवेगळे मार्ग काढत, आपल्या सहवासात येतील त्या तृषार्तांना तृप्त करीत, अनेक गावे समृद्ध करत, इतर नद्यांना कवेत घेत कराडपर्यंत येतात. कित्येक वर्षांनी दोघी बहीणी कशा कडकडुन भेटतील तितक्याच कडकडुन भेटतात. तो संगम बघताना अगदी छान वाटायचे. पुढे जाताना मात्र कृष्णा नाव घेउन, शांतपणा धारण करुन त्या पुढे निघतात. ही बंगालच्या उपसागराला जाउन मिळण्यापुर्वी ही आमची कृष्णा कित्येक आयुष्य समृद्ध करुन जाते.

Friday, April 27, 2007

माळी आज्जी

आम्ही नवीन घरी रहायला गेलो तेव्हा भर उन्हाळ्याचे दिवस असल्याने आजुबाजुच्या शेतात काहीही पिके नव्हती. अगदी आजुबाजुच्या कुठल्याही शेतातुन आमचे घर स्पष्ट दिसत असे. आमची सरस्वती सोसायटी पण एका शेतक~याची जमीन बिगरशेती करुन घेतली होती. ह्या शेताच्या तुकड्याशेजारचा तुकडा माळी आज्जीचा. भर उन्हाळ्यात आज्जी तिच्या शेतातल्या खोपटामधे रहायची. कधी कधी बाहेर दिसायची. कुठली कुठली मुले बोरे काढायला शेतात घुसायची त्यांच्यावर ओरडायची. दिसायला अतीशय कृश पण आवाज मात्र अतीशय खणखणित होता. कधी पाण्याची चरवी कुठुन तरी घेउन येताना पण दिसायची. ओळख नव्हती त्यामुळे आज्जी कधीतरी आमच्याकडे पहायची पण शक्यतोवर नाहीच. एकेदिवशी एक बाई पाणी देता का प्यायला? असे विचारत आल्या. पुढे म्हणाल्या, "एरीगेशनला पण पाणी नाही. आणि इथे असेल म्हणुन मग घरुन कशाला ओझे आणायचे असे वाटल्यामुळे आणले नाही." त्यांनी आपले नाव सांगितले. शेतात आलोय म्हणाल्या. त्या आज्जींच्या सुनबाई! पुढे बोलता बोलता त्या मम्मीला म्हणाल्या, "आमची सासु भांडुन गावातल्या घरातुन इकडे शेतात रहायला आलीय जरा लक्ष ठेवा. म्हातारं माणुस आहे. मी डबा देते घरुन पण म्हातारी खाते की नाही माहीत नाही." मम्मीला वाटले, असेल सासु-सुनेचे भांडण म्हणुन तिने पुढे काही विचारले नाही. असेच मधे ३-४ दिवस गेले. आणि मग आज्जी दिसली नाही बाहेर. मम्मीला वाटले भांडण मिटले असेल गेली असेल घरी. पप्पांना सांगीतल्यावर ते म्हणाले, "हिंदुराव माळ्यांची आई आहे ती, बघुन ये आहे का खोपटात."

मम्मी आणि तिच्या मागे सुबोध गेले शेत तुडवत खोपटात. दोघे साधारण १५-२० मिनिटानी परत आले ते ’माळी आज्जीला बरे नाही. dehydration सारखे झालेय. मग मम्मीने खसखषीची का आल्याची कसलीतरी खीर करुन नेउन दिली. दुसरेदिवशी सकाळी मला आणि सुबोधला परत चहा घेउन तिच्याकडे पिटाळले. आणि अशी अमची आणि माळीआज्जीची ओळख झाली.
तिला भेटल्यावर प्रकर्षाने जाणवलेल्या दोन गोष्टी म्हणजे आज्जीला ऐकु कमी येते आणि आज्जी अतिशय बारीक आहे.
हळुहळु ओळख वाढल्यावर कळले की आज्जीबाई सुनेशी नाही तर मुलाशी भांडुन वेगळ्या राहील्यात. सुनेची अतिशय तारीफ़ करत असत. लेकीसारखी सांभाळते वगैरे वगैरे! त्याकाळात ते ऐकायला पण वेगळे वाटायचे. आज्जीची सांपत्तिकस्तीथी फारशी चांगली नव्हती. नातु कमवत होता ते पण कॉलेज बांधताना या लोकांच्या जमिनी घेउन घरटी एक माणुस नोकरीवर घ्यायची संस्थेने कबुल केल्यामुळे लागलेली ति नोकरी होती. स्वत:च्या शिल्लक राहीलेल्या जमीनी पिकवायची घरात कुणाला इच्छा नव्हती.
पुढे पाउस सुरु झाल्यावर आज्जीने निशिगंध आणि गलांड्याच्या फुलांची झाडे लावली. फुले यायला लागल्यावर आज्जी मग सतत शेतात दिसायला लागली कारण कॉलेजच्या पोरी जाता येता फुले तोडुन न्यायच्या. मग प्यायला पाणी मागायच्या निमित्तने म्हणा किंवा मम्मीने चहा घ्या म्हणल्याने म्हणा आज्जीचे आमच्याकडे जाणे-येणे वाढले. तिचा मम्मीवरचा विश्वास पन वाढत गेला. मग फ़ुले विकुन आलेले पैसे ती आमच्याकडे ठेवु लागली. पुढे एकेदिवशी बाजारातुन येताना १ किलो मटकी घेऊन आली आणि मम्मीला म्हणाली मला जरा एक मोठे पातेले दे. मग निवडुन ती मट्की धुवुन भिजवुन ठेवली. दुसरेदिवशी एक स्वच्छ पोते आणि साडीचा तुकडा घेउन मटकी बांधायला. आणि मग २ दिवसानी सकाळी सकाळी ६ वाजता ती मोडाची पाटी घेउन आज्जीबाई तुरुतुरु कराड्च्या मंडईत विकण्यासाठी गेल्या! दुपारी १२-१ वाजता घामाघुम होऊन घरी! सगळी मटकी विकुन आलेले पैसे मोजुन घेउन परत पुढची मटकी आणलेली.

आज्जीला कष्टाची अतोनात सवय होती. सतत काही ना काही चालु असायचे. सगळीकडे चालत फ़िरायची कारण तिला बसमधुन वगैरे कोणीतरी पळवुन नेतील असे वाटायचे. स्त्रिशिक्षण वगैरे भानगडीमधे आज्जीबात रस नव्ह्ता. स्वत:च्या नातीला ७ वी झाल्यावर लांब शाळेत पाठवायचे नाही असे म्हणुन शाळा सोडायला लावलेली होती. आवाज अतिशय खणखणीत असल्याने तिने जाहीर केलेला निर्णय पण अख्ख्या गावाला कळलेला असला पाहीजे. आठवी-नववीत मी अजुन का शाळेला जाते ते तिला कळायचे नाही. सुट्टीच्यादिवशी कधी आज्जी शक्यतो घरी यायची नाही कारण पप्पा घरी असायचे. कधि चुकुन लक्षात न राहील्याने आलीच तर पप्पांना ’दादा काय चाल्लय? बाईने (म्हणजे मम्मीने) चा दिला का नाय?’ अशी चौकशी करुन मम्मीशी बोलुन पटकन जायची. मी सतत पुस्तक हातात धरुन असायचे त्याचा बरेचदा रागराग पण करायची. माझे ८-९ वी मधले वय असल्याने त्याचा बरेचदा राग पण यायचा. नंतर कधीतरी तिने मला भरतकाम करताना पाहीले आणि बरीच खुश झाली. ती नेहमी कुठल्या कुठल्या भाज्या आणुन द्यायची त्यात हरभ~याची भाजी, घाटे, चवळीच्या कोवळ्य़ा शेंगा, कांद्याची पात, लसणीची पात, श्रावण्घेवडा, काळ्या घेवड्याच्या शेंगा. तिच्यामुळे ह्या सगळ्या भाज्या अपसुक मिळायच्या. हे सगळे आणुन द्यायची त्याच्याबदल्यात १ कप चहाची पण तिची अपेक्षा नसे. कष्टाची अतोनात सवय होती त्यामुळे कुठले काम जड जायचे नाही. पण घरातल्या कुणाचीच साथ नसल्याने त्या कष्टाचे चिज कधी झालेच नाही. नातवंडांची लग्ने निघाली तेव्हा तिने साठवलेल्या पैशातुन नातीला साडी, नातसुनेला साडी घेतलेली आठवते. मग सुन करेल म्हणुन एक म्हैस घेउन दिली. सुनेला ते पण जमले नाही. म्हातारीने त्याचे सगळे कर्ज फ़ेडले बारीकसारीक कामे करुन पण ती म्हैस विकुन आलेले पैसे उडवायला घरच्यांना १ महीना पण लागला नाही!

माळीआजीमुळे अजुन एक गोष्ट कळली म्हणजे त्यांच्या गावात श्रावण महिन्यात ज्ञानेश्वरीचा सप्ताह होत असे. मी ९ वि मधे असताना प्रसाद घेउन मी आणि मम्मी गेलेलो. त्यावेळी ३ रा अध्याय पठण चालले होते. शाळेत तेव्हा आम्ही रोज ५ श्लोक अशी गीता म्हणायचो श्लोकाचे अर्थ अवघड वाटायचे. त्यादिवशी अर्धा एक तास जे काही तिथे वाचायला बसलेले तेव्हा एक-दोन श्लोकांचे अर्थ लागलेले पण आठवतात.

अशी ही माळी आज्जी आज अचानक आठवली. ती गेली तेव्हा माझी १२ वीची परिक्षा चालु होती. त्यामुळे तिचे शेवटचे दर्शन नाही मिळाले. पण तिची आठवण कित्येक दिवस मनात रेंगाळत होती. डिसेंबर मधे घरी गेले असताना मुलगा, नातु यांनी राहिलेल्या शेताचे विकुन खाल्याचे समजले आणि आजीने इतकी मेहेनतीने सांभळलेली जमीन घरच्यांनी अशी उडवलेली पाहुन अतोनात दु:ख झाले. ती बिचारी हे बघायला नव्हती तेच बरे झाले असे वाटुन गेले एकदम ...

Sunday, March 04, 2007

निर्मोही !!??!!

मेधाने महत्वाचा प्रश्नाला हात घातलाय - तुमच्या पुस्तकांची तुमच्यानंतर तुम्ही काय सोय लावणार आहात? असले अतिशय high funda विषय मला कधीच कसे सुचत नाहीत असा विचार करतच हे लिखाण करतेय.

खरंच माझी पुस्तके माझा जीव की प्राण आहेत. कुणी पुस्तकचे कोपरे वगैरे दुमडुन खुण वगैरे करत असेल तर मला प्रचंड राग येतो. देशात काहीही विकत घ्यायला जमत नसेल तर वाईट वाटत नाही पण दिलखुष बुकस्टॉला जाता आले नाही तर मात्र खुपच त्रास होतो.

मला पुस्तकांची आवड पप्पांच्यामुळे लागली. त्यांनी स्वत:ला पुस्तकांच्यासोबत रहायला आवडेल म्हणुन ग्रंथपालाची नोकरी पत्करली. स्वत:चे कित्येक पगार पुस्तकांवर खर्च केले. आम्हाला कधी बाहेर खायला घेउन गेले नाहीत पण चांगली पुस्तके वाचायला मिळावीत, संग्रही असावीत म्हणुन खुप खर्च केला. प्रसंगी मम्मीशी वादावादी पण झाली असेल. त्यांच्याकडे श्रीमानयोगीचे २ खंड आहेत तेही पहिल्या आवृत्तीतले आणि त्यांनी नावनोंदणी करुन घेतलेले. तसेच पुलंची खुप पुस्तके पहिल्या / दुस~या अवृत्तीतली. प्रकाश संतानी स्वत: स्वाक्षरी करुन भेट दिलेली पुस्तके. असले collection असताना त्याचे पुढे काय हा विचार करावासाच वातत नाही. मला भारतातुन येताना ती सगळी पुस्तके इकडे आणायची खुप इच्छा आहे त्यासाठी पप्पा तर तयार होतील कारण त्यांची पोरे सुस्थळी पडतील याची त्यांना खात्री आहे पण सुबोध आणि मम्मी असे दोन मोठे अडथळे पार करावे लागतील. 'मोह वाईट' वगैरे वाक्ये पुस्तकात लिहायला ठिक पण ती प्रत्यक्ष आचरणात आणणे काही शक्य वाटत नाही. पुस्तकांच्या बाबतीत तर नाहीच. पप्पांच्या पुस्तकांचे जाउदे पण माझ्या पुस्तकांचे काय करायचे? फ़ार काही मोठे collection नाही माझे पण आहे ते माझे आहे. संभाजी, बापलेकी, शरदासंगीत, वनवास, शाळा, गौरी देशपांडेंची बरीचशी पुस्तके, अनील अवचटांची पुस्तके!! माझ्यानंतर माझ्या ह्या लेकरांचे काय होणार? माझ्यानंतरचे जाउदे पण कायमचे भारतात जायचे ठरवले तर त्या पुस्तकांचे काय करायचे? लालूने दिलेले गिफ्ट, बाळुदादानी दिलेली पुस्तके अशी पुस्तके कुणाला नाही देऊ शकणार. काही पुस्तके अगदीच टाकावु आहेत त्यांचे काय करायचे हे ठरवणे खुप अवघड जाणार नाही पण माझ्या प्रिय पुस्तकांचे काय?

माझ्या दागदागीनांचे, साड्या, कपड्यांचे काय करायचे ते ठरवताना कदाचीत मला त्रास होणार नाही. पुस्तकांच्या बाबतीत निर्मोही होणे मला तरी शक्य होईल असे वाटत नाही? तुम्हाला काय वाटते? तुम्ही ठरवलेय तुम्ही तुमच्या पुस्तकांचे तुमच्यानंतर काय करायचे? कुणाला ह्यावर Tag व्हायला आवडेल?

Wednesday, February 28, 2007

होळी रे होळी ... पुरणाची पोळी

होळी आली की मला आठवतात त्या लहानपणी शिवाजी हौसिंग सोसायटी मधे केलेल्या २-३ होळ्या. मी दुसरीला वगैरे असेन तेव्हा. आमच्या घरी होळी असायची नाही म्हणुन मग शेजारच्या पाटलांच्या घरची होळी सकाळी सकाळी बघायला जायचे. मग सोसायटीच्या मोठ्या मुलांबरोबर लाकडे गोळा करत फ़िरायचे कारण सुट्टी असायची. शेखरदादा, शिवाकाका, दिलिप्या, राजा, हरीश, मुन्या, बकी, सविता बरीच पलटण असायची. मम्मीला बहुदा माहीत नसायचे कुठे जाणार ते. पण मुन्या आणि शिवाकाका लक्ष ठेवुन असायचे. कुठे काटे लागत नाहीत ना, कुठे तारेत कपडे अडकत नाहीत ना ते. कारण हे सगळे मम्मी पप्पांचे विद्यार्थी! त्यामुळे माझ्यापेक्षा तेच त्यादोघांना घाबरुन असत.

कुणाच्या शेणी चोर, कुणाला सांगुन मागुन आण, शेताच्या कडेला कुणी काढुन ठेवलेले जळणच उचल, शेतातल्या खोड्क्या वेच, आणि जर नुकताच बैल बाजार झालेला असेल तर मग तिथुन शेण्या गोळा करुन आण असले उद्योग चालायचे. आम्हा बरक्या पोरांचे काम फक्त मोठे कोणी बाजुने जात नाही ना ते पहायचे आणि मोठ्या पोराना सांगायचे. जेवायला घरी आले की मम्मीचा आणि पप्पांचा ओरडा खायचा कारण ऊन वाढलेले असायचे आणि परीक्षा जवळ आलेली असायची. जेवुन मग अभ्यासच करावा लागायचा कारण तेव्हा मम्मी पप्पा पण आपापल्या कामातुन मोकळे होउन आमच्यावर लक्ष ठेवायला रिकामे झालेले असायचे. मग एक डोळा बाहेर होळी रचणा~या मुलांवर ठेवुन कसाबसा अभ्यास संपवायचा. आणि ४-५ वाजता दुध पिउन मम्मीला लाडीगोडी लावुन बाहेर पळायचे. मधोमध एक एरंडाचे झाड असायचे आणि त्याभोवती होळी रचलेली असायची. रचलेली होळी ४-५ वेळा प्रदक्षिणा घालुन बघायची आणि आपण गोळा केलेल्या मालाचे ते नवे रुप बघुन आचंबीत व्हायचे!!

रात्री मग बरीच मोठी मुले, घरची मोठी माणसे होळीभोवती जमा व्हायची. कोणीतरी मोठे माणुस होळी पेटवायचे आणि मग होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जायचा. आणि तो नैवेद्य मग होळीत टाकुन पहीली बोंब ठोकली जायची! आणि मग काय ज्यानी पहीली बोंब ठोकली त्यांच्या नावाने जमलेली सगळी जनता बोंब मारायची. तिथुन जो दंगा सुरु व्हायचा की बास. सोसायटीमधल्या प्रत्येकाच्या नावाने पोरे शंख करायची!! पण आम्ही सगळे दारातुनच बघायचो. आम्हाला ओरडायची परवानगी नसे. पण तरी आम्ही ते ओरडणे enjoy करत असु.

रात्री केव्हातरी तो कार्यक्रम संपायचा त्याआधीच कधीतरी आम्ही थकुन झोपी गेलेलो असायचो!!

आणि आठवते ती एक दोन वेळा पाहीलेली आज्जीच्या घरची बारकीशी होळी. ५ गोव~यांची अप्पानी रचलेली. आज्जी त्याभोवती रांगोळी काढायची. मग अप्पा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचे आणि मग एकटेच ४-५ वेळा बोंब ठोकायचे ती पण एकदम हळुच! सोसायटीच्या होळीचा हंगामा कधीच तिथे नसायचा :)

इथे होळी म्हणजे उत्तर भारतीय पद्धतीने रंगाची खेळतात. मला ते रंगात ओले होणे आणि खेळणे फ़ारसे आवडत नाही त्यामुळे त्या विकेंडला घरी पुरणपोळीचे जेवण करुन मस्त ताणुन द्यायचे अशीच होळी गेले कित्येक वर्षे साजरी करतेय :)

म्हणा होळी रे होळी .... पुरणाची पोळी!!

Tuesday, February 13, 2007

शिक्षक पहावे होऊन ...

मी विद्यार्थी अवस्थेतुन शिक्षकावस्थेत कधी शिरकाव केला ते अजुनही नीट आठवते. M.Sc. ची २ वर्षे सोडली तर जवळपास १० वर्षे शिक्षकी केली. बीजगणित-भूमिती, चित्रकला, विणकाम, भरतकाम असले एकमेकांशी संदर्भ नसलेले विषय शिकवले. मम्मीच्या १ली ते ४थी च्या मुलांना मराठी, गणित, इतिहास, भूगोल पण शिकवले.

मला आठवते, मी पहीली दुसरीत असताना मम्मी आणि पप्पा मिळुन शिकवण्या घ्यायचे. त्या घरातुन मग दुसरीकडे रहायला गेल्यावर पप्पांनी ते सोडुन दिले पण मम्मीच्या पहिली ते सातवी शिकवण्या चालु होत्या. त्यातुन ती दुपारी शिवणकाम पण शिकवत असे. घरामधे सतत कोणी ना कोणी काहीतरी शिकत/शिकवत असेच. माझा आणि सुबोधचा अभ्यास पण त्या मुलांबरोबरच होत असे बरेचदा. हे सर्व पहाता पहाता मी स्वत: शिक्षीका केव्हा झाले ते मला समजले देखील नाही.

माझी पहीली विद्यार्थीनी म्हणजे सोनाली. ती शाळेत नेहमी व्यवस्थीत अभ्यास करणार, पहील्या पाच नंबरमधे येणारी ही मुलगी आठवीमधे गणितात कशीबशी पास झाली आणि तिच्या आईला एकदम टेंशन चढले! मग क्लासेसची चौकशी सुरु झाली. काही कारणांमुळे बाहेर कुणाकडे क्लास लावता येणे शक्य नव्हते. असेच बोलता बोलता मला समजले आणि मी तिला सांगितले की, जी गणिते आडतील ती विचारयाला येत जा! अशी अडलेली गणिते सोडवताना तिला वाटले की आपण इथेच रोजची शिकवणी लावाली तर! पण मला जबाबदारी घ्यायची नव्हती कारण माझी practicles, journals, college ह्यातुन मला कितपत जमेल असे वाटत होते. पण खुप आग्रह झाला आणि मग ती जबाबदारी घेतलीच शेवटी. ती रोज येते हे कळल्यावर मग जवळच्या एका शेतकर्यांची मुलगी पण म्हणाली मी पण येणार! झाले मग ह्या दोन पोरी आणि मी आमची सकाळी ८ वाजल्यापासुन गणिताशी झटापट सुरु व्हायची ती मी कॉलेजला किंवा त्या शाळेत जाईपर्यंत!! आणि ह्या शिकवणीचे निकाल, निक्काल प्रकारात न लागता एकदम चांगले लागले. सोनाली १५० पैकी १३२ गुण मिळवुन पहिल्या १५ मधे तरी परत आली आणि ज्योती आठवीला पुढे ढकलली गेलेली तिला १५० पैकी ९० गुण मिळाले. आणि ह्या सर्व गोष्टींचा माझ्या आभ्यासावर काहीही परिणाम (म्हणजे वाईट हो!!) झाला नाही.

पुढे १ली ते ७ वी पर्यंत जे कोणी येईल त्यांना जो लागेल तो विषय शिकवला. बर्याच मुलाना अभ्यासाचे महत्व पटले, गोडी लागली हे त्यांचे आणि माझे दोघांचेही नशिबच म्हणा ना!

M.Sc. करुन परत आल्यावर काय करायचे असा विचार चाललेला होताच. तेव्हा कॉम्प्युटरचा एखादा डिप्लोमा करावा म्हणुन पराडकर क्लासेसला गेले. पराडकरसरांनी सगळी चौकशी करुन मला विद्यार्थी + शिक्षीका असा दुहेरी मुकुट घातला. सकाळी ७.३० ते १२.३० शिक्षक आणि दुपारी २ ते ३ विद्यार्थी असा दिवस विभागला जायला लागला. त्यावेळचे विद्यार्थी म्हणजे अजय शहा वगैरे. अतिशय सज्जन मुले. आयुष्यात काहीतरी करुन दाखवायचे ही जिद्द असलेली. त्यामुळे सतत नवीन शिकण्याच्या मागे. ह्या मुलांना मी त्यावेळी MS Windows, Word, Lotus वगैरे fundamentals शिकवायचे. आजच्या technology च्या मानाने हे फ़ारच जुनेपुराणे वाटते पण त्यावेळी खरोखर ते शिकवण्यासाठी क्लासेस होते.

पुढे पराडकरसरांना १०वी च्या summer vacation साठी teaching assistant हवा होता. मग ते पण माझ्याच गळ्यात आले. १० वीची डामरट पोरे ती पण उन्हाळ्याच्या सुट्टीत अभ्यासाला बसवायची यासारखे कौशल्याचे काम इतर कोणतेही नाही! काय त्या खोड्या, काय ते अभ्यास न करण्याचे बहाणे अहाहा!! पण वर्गात एकदम धमाल असायची. मुलींतर नेहेमी मागे मागे असायच्या. तिथे रोज साड्या नेसुन जायची सवय झाली. मग पोरींच्या साड्याबद्दल कॉमेंटस आणि कॉम्प्लिमेंट्स, आवर्जुन फुले आणुन देणे वगैरे नेहेमीचे झाले. तेव्हाच मी रोज सातारला पण जायचे शिकवायला. तेव्हाच कम्युटींगचा पहीला अनुभव पदरात पाडुन घेतला. कराडमधे विद्यार्थी गावात कुठेही भेटायचे, बसमधे, रिक्षात, घाटावर, मंडईत. काहीजण मुद्दम ओळख दाखवुन बोलायचे तर काही आपले लक्ष नव्हते असे दाखवायचे! एकुण मजा यायची.
ह्या मुलांपैकी काहीजण आता US मधे नोकरी, उच्चशिक्षणासाठी आलेत. ऑर्कुटवर भेटतात. मजा वाटते.

त्याचदरम्यान कराड इंजिनीअरींग कॉलेजमधे प्रॅक्टीकल घेण्यासाठी कोणितरी हवे आहे असे कळले. सहज जाउन मी तिथे प्रिन्सिपलना भेटले तर त्यांनी ताबडतोब काम सुरु करायला सांगीतले. डिपार्टमेंट हेडना जेव्हा कळले की मी Statistics मधे M.Sc. केलेय तेव्हा त्यांनी लगेचच मला probability चे एक लेक्चर घ्यायला सांगितले. ते स्वत: मागे येउन बसले. माझे शिकवणे त्यांना बरे(!) वाटले असावे, पुढे आठवड्यातुन २ तास घेण्यास सांगितले. दुस~या सेमीस्टर ला मग Numerical Mathematics शिकवला. Practicles करताना लक्ष ठेवणे वगैरे चललेलेच होते. इथले माझे विद्यार्थी माझ्याहुन कसेबसे १ ते २ वर्षाने लहान होते. पण उच्चशिक्षणासाठी आल्याने व्यवस्थित अभ्यास वगैरे करायचे. अर्थात टवाळक्या वगैरे पण व्हायच्याच. काही मित्रासारखे मदतीला आले. तिथे मी अडिच वर्षे शिकवले. २ बॅचेसना शिकवले, ज्योतीसारखी जिवाभावाची मैत्रीण मिळाली. खुप चांगले, थोडे वाईट अनुभव गाठीशी बांधले.

ह्या काही वर्षांच्या ब~या-वाईट अनुभवांची शिदोरी आता जन्मभर पुरणारी आहे. सगळ्यात जास्ती कसोटी लागली ती एका गुणाची - patience!!!