Tuesday, November 28, 2006

जोगीण

काल प्रिया च्या चाट चा status message ह्या कुसुमाग्रजांच्या कवितेच्या पहिल्या ३ ओळी होत्या. मी कवीतांपासुन नेहेमी ४ हात लांब रहाणारी, पण ह्या ओळी मात्र एकदम भावल्या. तिच्या परवानगीने मग मी तो माझा status message केला (अर्थात तिला दुसरी ह्या कवितेसारखी अजुन एक मस्त कविता मिळालीच!!) त्यावर अजुन एका मैत्रीणीने विचारल्यावरुन ही सगळी कवीता इथे टाकतेय.

जोगीण

साद घालशील तेव्हाच येईन,
जितकं मागशील तितकंच देईन...
दिल्यानंतर देहावेगळ्या सावलीसारखी निघून जाईन...

तुझा मुगुट मागणार नाही,
सभेत नातं सांगणार नाही...
माझ्यामधल्या तुझेपणात जोगीण बनुन जगत राहीन...

~कुसुमाग्रज

सुमेधा, वृषाली सारख्या मैत्रीणीना आश्चर्याचा धक्का बसल्यावाचुन रहाणार नाहीये !!!

Tuesday, November 21, 2006

एकटेपणा

मला सगळ्यात जास्ती नकोसा वाटतो तो एकटेपणा. मला आठवतेय तशी मी सतत माणसांमधेच राहीले आहे. पण माणसांच्या गोतावळ्यात राहुनही कधीकधी एकटेपणा घेरतो त्याला काय म्हणायचे? मला आठवतेय ४थी मधे शाळा सुटल्यावर scholaship चा क्लास असायचा. तो झाला की मी आणि मेघु टंगळमंगळ करत घरी जायचो. घरी जाईपर्यंत साधारण २ वाजायचे म्हणुन शाळा सुटल्यावर खाण्यासाठी मम्मी पप्पांच्याबरोबर १०.३० ला चपाती-भाजी किंवा भाजी-भाकरी-लोणी असा डबा द्यायची. वर्गात सगळ्यांचेच तसे डबे यायचे. आम्ही शाळा सुटल्यावर साधारण १२ वाजता तो डबा खायचो.
घरी पोहोचायचे तेव्हा मम्मीच्या शिकवण्या, शिवणकाम, शिवणकामाचे क्लास असे काही ना काहीतरी चालु असायचे. त्यामुळे मग मला राहिलेला भात वगैरे एकटीलाच खावे लागायचे. एकटीला जेवताना अज्जिबत जेवण जायचे नाही. कसे तरी पोटात ढकलायचे आणि अभ्यास किंवा खेळ सुरु करायचा. मला अजुनही कधितरी ते एकटीने जेवलेले आठवते आणि एकदम एकटेपणाची जाणीव होते. गेले काही दिवस असेच एकटीने जेवतेय. घर थंड पडलेले, बाहेर ५ वाजताच दाटुन आलेला काळोख, ह्या सगळ्यामुळे खाण्याची इच्छाच नाहीशी होते. मग हा एकटेपणा घालवण्यासाठी रोज घरी भारतात फोन करायचा किंवा मग रात्री उशीरापर्यंत chatting करत बसायचे. सकाळी मग नीट जाग येत नाही वेळेवर मग निश्चय करायचा कि आजपासुन वेळेवर झोपायचे!
सध्या घरी सुबोधच्या लग्नाची तयारी खुप जोरात चालली आहे आणि मी सगळे मिस करतेय. ते मला मिस करताहेत की नाही महिती नाही, असावेत असे वाटतेय. पण ह्या सगळ्यामुळे मला माझ्या एकटेपणाची जाणीव खुप प्रकर्षाने होते आहे. जेवावे वाटत नाही. काहीही न करता फ़क्त बसुन रहावे असे वाटत रहाते. सगळ्या जगावर चिडचिड होते. पण ती चिडचीड कुणालाच कळत नाही.

गेले काही वर्षे एका अर्थाने एकटीच रहातेय, पण एकटेपणाची सवय मात्र अजीबातच झालेली नाहीये. कधीकधी ह्या गोष्टीचा आनंद होतो कधी स्वत:चा प्रचंड राग येतो.

आज मला सतत ऐकावे वाटतेय असे गाणे -
मै और मेरी तनहायी अक्सर ये बाते करते है।



ह्या गाण्याचा आणि एकटेपणाचा काही संबंध आहे का? असावा ...

Wednesday, October 25, 2006

Tuesday, October 10, 2006

मेहेन्दीचा अनोखा रंग

30 Sept ला मी Hers Annual Breast Cancer walk ला गेलेले. हे माझे तिथे जाण्याचे दुसरे वर्ष. मला hike ला जायला आवडते म्हणुन मी पहिल्या वर्षी जाणार होते पण त्या संस्थेच्या चालीकेला कळले की मला बर्यापैकी ठीक मेहेंदी काढते आणि हौशी कलाकार आहे वगैरे. तिने मला गळ घातली आणि मी त्यावर्षी जाउन जवळपा्स ७५-८० पोरी आणि बायकांच्या हातावर नक्ष्या काढुन परत आलेले. मला त्याचे पार अप्रुप न वाटल्याने, त्याचे फ़ार महत्व न वाटल्याने गेल्या वर्षी मी गेलेच नाही. ह्यावर्षी त्या चालीकेचा परत फोन आला आणि मी हो म्हणाले. एक तर वेळ होता आणि मेहेंदी काधायला हात शिवशिवत पण होता. पण ह्यावेळी बाकीचे volunteers खुपसे interested नसल्याने गर्दी तशी कमीच होती. एक साधारण ६० वर्षाची दोक्यावर अजिबात केस नाहीत अशी तरुणी(!)तिच्या २ मैत्रिणींच्यासोबत माझ्याकडे आली आणि म्हणाली की तिच्या डोक्यावर मागच्या बाजुला एक डिझाईन कढणार का? मला तिच्याकडे बघुन कल्पना आलीच होती की ती सध्या किमोथेरपी मधुन जात असावी. मी आनंदाने एक डीझाईन काढले. तेवढ्यात मग opening ceremony चालु झाला आणि ती मला म्हणाली की ती walk झाल्यावर परत येइल. त्या ओपनींग सेरेमोनी मधे मला कळाले की ती सगळ्यात अलिकडची survivor आहे. तिचे operation होऊनफक्त २ महीने झालेले. माझ्या डोळ्यात एक्दम पाणी आले. किती उत्साही होती ती! इतक्या मोठ्या life threatening event मधुन जाउन पण एकदम उत्साही, खेळकर!
उद्घाटनाचा कार्यक्रम एकदम मनाला स्पर्शुन जाणारा होता. माझ्या एका मैत्रीणीची आई २ वर्षापूर्वी breast cancer मुळे अचानक गेली आणि मला ह्या विषयाची गंभीरता जास्ती समजली. सगळ्यानी आपापले नविन वय सांगितले. एक जण तर ३० वर्षे survivor आहे.
Walk संपला आणि ती कन्या माझ्याकडे परत आली म्हणाली आता परत थोडे डीझाईन काढ! मग मी तिच्या डोक्यावर मागच्या बाजुला अजुन काही डिझाईन काढले. तिच्या मैत्रीणीना खुप आवडले. तिच्या आनंदात त्यानी मला पण सामील करुन घेतले. माझ्या डोळ्यातुन एकदम पाणी आले. माझी कला अश्याप्रकारे कधी कोणाला आनंद देईल असे मला अजीबात वाटले नव्हते. त्यानंतर जवळपास १०-१५ जणी येउन माझे आभार मानुन गेल्या कारण काय तर - I helped a survivor enjoy her day and she helped many of them to celebrate!

Saturday, September 02, 2006

॥ गणपती बप्पा मोरया ॥



घरी मम्मी पप्पा गणपती बसवायला लागुन जवळपास आता २० वर्षे तरी होत आली. गणपती माझ्या अतीशय आवडीचा देव. तसा तो सगळ्यांचाच असतो म्हणा. गेल्या ७ वर्षातल्या गणपतीला मी भारतात नाहीये. माझ्या पद्धतीने मी माझ्यापुरता गणपती साजरा करते. सकाळी उठुन दुर्वा काढुन आणणे, त्या निवडुन नीट त्याच्या जुड्या बनवणे, फुले काढुन आणणे, रांगोळी काढणे असले उद्योग करत सकाळ जायची. घरात मम्मी नंदादीप ठेवते मग त्यात तिला मदत करणे. फ़ुलवाती, कापसाची वस्त्रे करणे ह्यात पण मम्मीला मी आवडीने मदत करायचे. अता ते काही करत नाही- करावे वाटते पण ...
मला माझ्या आठवणीतले खुप गणपती कोल्हापुरला किंवा पुण्याला आजी जिथे असेल तिथे असायचे ते पण आठवतात. आम्ही सुट्टी घेउन जायचो. आजी गेल्यावर मग पुण्यात काकांच्याकडे असायचा गणपती ते पण आठवते. पण लक्षात राहीलेला एक गणपती - मी फ़क्त २ वर्षाची होते, कोल्हापुरच्या घरात बसवलेला गणपती, अण्णा करत असलेली पुजा अंधुक आठवते. बाकी काही नाही आठवत. मग अण्णा गेल्यानंतर पप्पा आणि कडगावच्या अज्जांबरोबर जाउन आणलेला गणपती, घरातली पुजा, विसर्जनाला मी हट्टाने गेलेले, घरचा गड्याने, नागाप्पाने, गणपती विसर्जन करताना वाईट वाटलेले अजुन आठवते.
कराडला जेव्हा आम्ही स्वत:च्या घरी रहायला आलो तेव्हा आणलेला पहीला गणपती पण आठवतो. मी आणि मामा गेलो होतो आणायला. पाउस पडत होता. आणि बसमधुन चिखलातुन सावरत आणलेला गणपती आठवतो. रात्री आम्ही चौघे मिळुन गणपतीची आरास करायचो. खुप आरास नसायची मग ते सगळे मी वेगवेगळ्या flower arrangements करुन सजवुन टाकायचे. रोजाचे पंचाम्रुत करायचे काम माझ्याकडे असायचे. ऋषीपंचमीला मम्मी सकाळी भजनाला पाथवायची ते पण आठवते. त्यादिवशी जाताना आजीसाठी आमच्या बागेत पिकवलेली भाजी आजिच्या उपसासाठी बरोबर न्यायचे. मग मम्मी संध्याकाळच्या भजनाला जाताना मग परत आजीसाठी काहीतरी घेउन जायची.

मामांकडचा गणपती अप्पाअसेपर्यंत ते घरीच बनवायचे. त्याचे ते साचे वगैरे सगळे ते नीट ठेवायचे श्रावणातच त्यांची मूर्ती बनवायची गडबड सुरु व्हायची. गौरीचे मुखवटे पण ते घरी बनवायचे. शाळा असल्यामुळे सगली प्रोसेस कधी पूर्ण पहायला नाही मिळाली पण घरी बनवलेला गणपती असल्याने आजीकडच्या गणपतीची मजा वेगळीच असायची. मामा लोक अगदी मन लावुन साग्रसंगीत आरास करायचे. मुंबईला असलेले मामा नेहेमी गणपतीला सुट्टी काढुन घरी यायचे. विसर्जनाच्या दिवशी मग एक मामा पप्पांच्या मदतीला घरी येणार मग आमचा गणपती विसर्जन करुन, प्रसादाची खिरापत वाटुन मग आजीकडचा गणपती पोचवायला मग मी आणि कधीतरी सुबोध मामांकडे जायचो. आम्ही नदीपासुन दुर रहायचो म्हणुन मग आमचा गणपती विहिरीमधे विसर्जन करायचो. मामांचा गणपती मात्र नेहेमी नदिवर मग धाकटा मामा अगदी नदीमधे आत जाउन गणपती विसर्जन करायचा. पण आम्हा पोराना मात्र नदिच्या पाण्यात पाय घालायची पण परवानगी नसायची. कारण कोयना दुथडी भरुन वहात असायची, बरेचदा विसर्जनाच्यावेळी पऊस पण असायचा. आजीकडचे विसर्जन होईपर्यंतजवळ्पास रात्रीचे साडेसात वाजायचे. खिरापत घेउन मग घरी येत असताना मग मामालोकांच्या डोक्यात गणपती पहायला जायचे विचार यायचे. मग एक मामा सायकलवरुन मम्मीला सांगायला घरी सुटायचा. मग आजीकडेच जेउन रात्रभर गणपती बघुन मग आजीकडे झोपायचे मग कोणीतरी मामा सकाळी ८ वाजता घरी सोडायचा. आजीच्या बरोबर तिच्या अंथरुणात झोपायला मस्त वाटायचे. सकाळी जाग यायची ती आजी गणपतीचे सगळे आवरुन ठेवत असायची त्याचे आवाज ऐकतच.

सहावी ते जवळपास बारावी पर्यंत जवळपास हाच कार्यक्रम असायचा. नंतर हे सगळे कधी आणि का बंद झाले ते पण समजले नाही. दरवर्षी गणपती मधे ह्या सगळ्या आठवणी जाग्या होतात, कधी हसु येते कधी रडु येते. सगळ्याच्या आठवणी येतात. अजोबानी केलेले गणपती आता पहायला नाही मिळणार म्हणुन वाईट वाटते. पण माझा गणपती बाप्पा येताना माझ्यासाठी सहत्रावधी आठवणींचे मोदक घेउन येतो हेच मला खुप महत्वाचे वाटते.

Wednesday, August 16, 2006

आजी

आज एका मित्राशी बोलताना सहज आज्जीचा उल्ल्लेख आला आणि मला माझ्या दोन्ही आज्यांची अतोनात आठवण झाली. त्या दोघी पण अपापल्या परीने great होत्या. मी लहान असतना आज्याना नावाने हाका मारायची पद्धत नव्हती. त्यामुळे आम्ही आईच्या आईला कराडची आजी आणि पप्पंच्या आईला कोल्हापुरची आजी असे साधे सरळ ओळखायचो.

कोल्हापुरच्या आज्जीला नेहेमी स्वेटर विणत नाहीतर भरतकाम करताना पहिलेले. ती सतत स्वत:ला कशात तरी गुंतवुन ठेवायची. एक्दम भारदस्त व्यक्तिमत्व होते. आता मला तिचा आवाज नाही आठवत. पण तिच्याबरोबरचे प्रसंग मात्र इतके नीट आठवतात न. तिच्या साड्या. तिची देवाला जायची पिशवी. तिच्या गळ्यातली चेन, तिच्या कुड्या. तिचे बाबा घरी यायचे त्यांच्याबरोबरचे बोलणे. तिच्या वडीलांवर तिचे अतोनात प्रेम होते असे सगळे सांगतात. काकांबरोबरचा कानडी-मराठी संवाद. माझ्यावर आणि अजुवर नीट लक्ष ठेवणे. ती देवासमोर लिंगपुजा करायला खुर्चीत डोळे मिटुन बसलेली. मम्मी स्वयंपाक करत असेल तर तिला मदत करताना दिसते. काका लोक सुट्टीवर आले असले किंवा येणार असतील तर चकल्या करायची आणि कायम कट्ट्यावर बसुन सगळे करायची. इडलीचे पीठ रगड्यावर वाटतानाची आजी दिसते. मशिनवर काहीतरी शिवत बसलेली आजी दिसते. वायरच्या पिशव्या करतानाची आजी. मला हाताला धरुन वटेश्वराच्या देवळात नेतानाची आजी. मला एकबाजुला दार असलेलीच रिक्षा लागत म्हणुन कित्येक वेळ वाट पहात बसलेली आजी. एवढ्या तेवढ्या रस्त्यासाठी रिक्षा कशाला पहिजे म्हणुन चिडणा~या काकांकडे काणादोळा करणारी आजी. मी आणि अजुने नीट जेवावे म्हणुन घराभोवती चक्कर मारत जेवु घालणारी, आमच्या मागोमाग घराभोवती तिने किति चकरा टाकल्या असतील त्याला नेम नाही. माझ्या आणि काकांची भांडणे माझी बाजु घेउन सोडवीणे. मी दुध नीट आणि पटकन प्यावे म्हणुन वेगवेगळी अमीशे दाखवणारी आजी.
सुबोधचा जन्म झाला तेव्हा मी आज्जीबरोबर कोल्हापुरला होते. कराडला मम्मीला भेटायला आलॊ तेव्हा मम्मीला दवाखान्यात बघुन मी प्रचंड घाबरले होते. आजीने जवळ नेउन सुबोध दाखवला होता. ती कोल्हापुरला असेल तेव्हा मी तिच्याबरोबर कोल्हापुरला आणि ती पुण्याला असेल तेव्हा मी पुण्याला. तिच्या बरोबरचे मला आठवतात ते दिवस - मोरपंखासारखे मऊ गुदगुल्या करुन जातात. माझ्या त्या वयातल्या सगळ्या आठवणी तिच्या बरोबरच निगडित आहेत.
मधे कोल्हापुरच्या घरी गेलेले तेव्हा तिने केलेली पेंटींग्स पाहीली परत तिच्या आठवणीनी डोळ्यात गर्दी केली. तिने पेंट केलेली एक साडी अजुन मम्मीकडे आहे - मला आठवतेय त्याप्रमाणे मी नेसलेली पहिली साडी ती !!! तीची एक खुप जुनी डायरी त्यातल्या सगळ्या नोंदी इंग्लिश मधे आहेत !! तिच्या विणकामाच्या सुया, तिची स्वेटरच्या डीझाईनची इंग्लिश पुस्तके हा खजाना मला सापडला तेव्हा झालेला आनंद झालेला अजुनही जशाचा तसा आठवतो! आयुष्यात अनेक आघात पचवलेली पण स्वभावाने कडवट नसलेली अशी माझी आजी. ती गेली तेव्हा मी तिसरीमधे होते तिचे शेवटचे दर्शनपण मिळाले नाही मला ....

दुसरी आजी, कराडची आजी त्यामानाने खुप साधी घरगुती. छोटी अंगकाठी, एकदम कृश शरीर, काळजीने पडलेल्या सुरकुत्या. पण कधीही न खचलेली माझी आजी. तिच्या स्वयंपाकाला काय मस्त चव आसायची. पटापट काम करायची. कमरेत वाकलेली, सतत काहीतरी निवडत बसलेली, पुजेचे साहित्य तयार करतानाची आजी. तिने घासलेली देवाची पितळॆची भांडी इतकी लखलखायची की बास! ही आजी पुजेला पाटावर बसायची. तिच्या चेहेर्यावरचा तो सात्विक भाव अजुन आठवतो. कधीतरी आमच्याकडे रहायला यायची त्यावेळी मम्मीच्या आणि तिच्या गप्प रात्ररात्र चालायच्या. आजी गावातच असल्याने तिच्याकडे जाउन राहायचे प्रसंग खुप आले नाहीत. पण सगळ्यात जास्ती संबंध तिच्याबरोबरच आले. ती स्वयंपाक करताना पाहुन मला खुप शिकायला मिळले. तिला मी पावभाजी शिकवली, पुलाव शिकवला. प्रचंड हालाखिच्या परिस्थितीमधे पण अजिबात न मोडणारी आजी. आजोबा गेल्यानंतर खचलेली तरी मामांच्या पाठीमागे उभी असलेली आजी. माझ्या विणकामाचे भरतकामाचे कौतुक करणारी आजी. ते पाहुन माझ्या दुस~या आजीची आठवण हमखास काढणारी ही आजी. कुणाकडुन, अगदी पोटच्या मुलांकडुनपण कसलीही अपेक्षा न करणारी आजी. वयाच्या ७०व्या वर्षी पण अंबट ताक, अंबटचुक्याची भाजी आवडीने खाणारी आजी. देवळात जाउन भजनाला बसलेली आजी. देवावर प्रचंड विश्वास असणारी आजी. माझ्या पहील्या पगारात मी तिला घेतलेली साडी कौतुकाने नेसणारी आजी. तिने मला दिलेला गणपती माझ्या पुजेमधे आहे - पूजा करताना मला नेहेमी तिची आठवण येते. मम्मी आणि नंतर मी तिला दर सोमवारी भेटायला जात असु तेव्हा आमची वात बघत दुकानात एकटीच बसलेली आजी. मला आणि सुबोधला गुळाच्या कणकेच्या करंज्या आवडतात म्हणून आवर्जुन करणारी आजी. तिचे घरी केलेले बुंदीचे लाडू, घरी केलेल्या जिलेब्या -- आहाहा.
ती गेली तेव्हा मी भारतात नव्हते. मला मम्मीकडुन कळाले तेव्हा एकदम जाणवले - सगळे आजीआजोबा गेले. हक्कने हट्ट पुरवुन घेणारी ठिकाणे आता राहिली नाहीत.त्यानंतरच्या सगळ्या भारतभेटीमधे मामांकडे गेले की पहील्यांदा जाणवते ते हे की, आता आजी दुकानात कधीही दिसणार नाहिये! इथल्या पहिल्या पगारात मी तिला साडी नाही घेउ शकले याची पण खंत वाटते!

Tuesday, August 01, 2006

पाउस - एक love hate relationship

सध्या कराड मधे पावसाने नुसते थैमान घातलेय त्याचे फोटो पाहुन आणि मम्मी कडुन कहाण्या ऐकुन मला कराडमधे घालवलेले असंख्य पावसाळे आठवले.

प्राथमीक शाळेत असताना पाउस फार अवडायचा शाळा घरापसुन लांब होती आणि एखादे दिवशी रेनकोट विसरले तर मनसोक्त भिजायला मिळायचे. मम्मीचा ओरडा मिळायचा पण त्याचे फारसे काही वाटत नव्हते. पावसाच्या साचलेल्या पाण्यात मनसोक्त उड्या मारत भिजत यायचे. ते पावसाळ्याचे बूट नामक जो प्रकार मिळायचा त्याने माझ्या पायाची सालटी निघालेली असायची. त्यात माती जाउन झणझणायचे. पावसात सारखे खेळल्याने सर्दी खोकला असायचाच. बुचाची फुले वेचायची त्याचे गजरे करायचे. श्रावण तशातच यायचा. आमच्या त्या शाळेत नागोबाचे देऊळ होते. इतर दिवशी आम्ही त्या कट्ट्यावर खेळायचो. पण नागपंचमी दिवशी शाळेला सुट्टी असल्याने मग सकाळी शाळेत पाटीपूजनाला जाउन यायचे. नारळ खोबरे चघळत रिमझिम पावसात भिजत घरी. संध्याकाळी परत नागोबाला जायचे. पावसाचा आणि नागपंचमीचा इतका अतूट संबंध होता की बास. पावसाळ्यात शाळा सुरु ह्वायची त्यामुळे ती पुस्तके न भिजता घरी यावित म्हणुन मग प्लास्टीकच्या पिशव्या असायच्या. पाटीसाठी अजून एक पिशवी - उतारा भिजुन पुसु नये.
त्याकाळात पाउस म्हणजे मजा वाटायची - पाउस आला की आनंद व्हायचा.

पाचवीमधे गेले तेव्हा हट्टाने छत्री मागुन घेतली. मग सायकल आल्यावर त्या छत्रीचे नखरे परवडेनासे झाले. ६वी ७वी मधे पाउस रोमांचक असतो वगैरे जाणवु लागलेले. मैत्रीणींबरोबर एका हातात सायकल आणि एका हातात छत्री घेउन खिदळत घरी यायचे. कॊलेजची पोरे मुद्दाम पाणी उडवुन जायची. पाटीपुजन वगैरे बंद झालेले. पावसाचे पाणी बघत बसायची खोड लागली.

७वीच्या वर्षात पावसाने हाहाकार माजवलेला... एका नवीन घरात भाड्याने रहात होतो. तिथे बाहेर पाऊस पडायचा तितकेच घरात गळायचे. मम्मीने वर्षाचे धान्य भरुन ठेवले होते ते सर्व भिजुन गेले. स्वत:च्या घरात जाणर म्हणुन आनंद मानायचा की घरातले अन्न धान्य नासधुस होताना पाहुन अश्रू गाळायचे या चिंतेत मम्मी पप्पा असायचे. सुबोध एकदा शाळेतुन घरी आला आणि मम्मी त्याला जेवायला वाढत होती तेवढ्यात इतका जोराचा पाउस आला की त्याला जेवायला सुद्धा मिळाले नाही. त्याक्षणाला मम्मीला काय वाटले असेल ते एक तीच जाणे! ... त्यावर्षी पावसाने डोळ्यातून पण पाऊस आणला ... एका महीन्यात प्रचंड नुकसान करुन गेला हा पाऊस. त्यावर्षी मात्र तो नकोसाच वाटला ...

तिथुन स्वत:च्या घरात आलो. आपले घर म्हणुन एक वेगळाच आनंद होता. आजुबाजुला सगळी शेतिच होती. शाळेला बसने जावे लागणार होते कारण तोपर्यंत मामासाहेबानी सायकल हरवलेली होती. शेतात राहयला आल्यामुळे आजुबाजुचे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पहाताना पाहुन वेगळेच वाटायचे. गरम काळ्या मातीत पडलेला वळीवाचा पाऊस त्याचा तो खमंग वास अहाहा... शाळा सुरु होईपर्यंत मग असाच वळिव खिडकितुन बघत श्रीमानयोगी, मृत्युंजय, व्यक्ती आणि वल्ली अशी एकामागोमाग एक पुस्तके वाचुन काढत वळीव काढला. शाळा सुरु व्हायचे दिवस आल्यावर मग शाळेच्या खरेदीबरोबर नविन पावसाळी चप्पल, नवीन छत्रीची खरेदी झालेली.
आणि शेतात घर असण्याचे तोटे पहिल्या शाळा सुरु झाल्याच्या पहिल्या १५ दिवसातच समजले. घरापर्यंत जाण्यासाठी शेताच्या पाणदी मधुन रस्ता - गुडघा गुडघा चिखल असे करत बस गाठेपर्यंत कसरत व्हायची. मधे कॊलेज लागयचे तिथे चिखलाने बरबटलेले पाय धुवुन बस गाठायला पळायचे.
पावसाचा पूर्ण चार्म तिथेच संपला...

आज इथे बे एरीया मधे रहाताना पावसाळा म्हणले की आठवते ती तुफ़ान थंडी. नशीब एवढेच की बर्फ़ उकरावा लागत नाही. ऒफीसच्या खिडकितुन पाउस बघत माझी सहकारी अतिशय भावुक होते. मनात पावसात मनसोक्त भिजण्याची स्वप्ने पहाते. तिला पाहुन वाटते, आपल्याला हे सर्व Romantic का नाही वाटत? मग थोडावेळ विचार केल्यावर जाणवते अत्ता घरी असते तर मस्त पैकी हीटर लावुन पायावर शाल घेउन पुस्तक वाचत पडायला काय बहार येईल. एखाद्या वीकेन्ड ला ते स्वप्न सत्यात पण येते. माझ्या मनाने मी पावसाचा आनंद घेते.

असा एखादा दिवस मी अगदी मनापासुन मी पाउस enjoy करते पण बरेचदा त्याला पाहुन मनावर मळभ दाटुन येते, लहानपणीचे पावसाने वाया घालवलेले दिवस आठवतात ... वाईट वाटते पण मी त्याला माफ़ करुन पुढे चालु लागते ....