Friday, April 27, 2007

माळी आज्जी

आम्ही नवीन घरी रहायला गेलो तेव्हा भर उन्हाळ्याचे दिवस असल्याने आजुबाजुच्या शेतात काहीही पिके नव्हती. अगदी आजुबाजुच्या कुठल्याही शेतातुन आमचे घर स्पष्ट दिसत असे. आमची सरस्वती सोसायटी पण एका शेतक~याची जमीन बिगरशेती करुन घेतली होती. ह्या शेताच्या तुकड्याशेजारचा तुकडा माळी आज्जीचा. भर उन्हाळ्यात आज्जी तिच्या शेतातल्या खोपटामधे रहायची. कधी कधी बाहेर दिसायची. कुठली कुठली मुले बोरे काढायला शेतात घुसायची त्यांच्यावर ओरडायची. दिसायला अतीशय कृश पण आवाज मात्र अतीशय खणखणित होता. कधी पाण्याची चरवी कुठुन तरी घेउन येताना पण दिसायची. ओळख नव्हती त्यामुळे आज्जी कधीतरी आमच्याकडे पहायची पण शक्यतोवर नाहीच. एकेदिवशी एक बाई पाणी देता का प्यायला? असे विचारत आल्या. पुढे म्हणाल्या, "एरीगेशनला पण पाणी नाही. आणि इथे असेल म्हणुन मग घरुन कशाला ओझे आणायचे असे वाटल्यामुळे आणले नाही." त्यांनी आपले नाव सांगितले. शेतात आलोय म्हणाल्या. त्या आज्जींच्या सुनबाई! पुढे बोलता बोलता त्या मम्मीला म्हणाल्या, "आमची सासु भांडुन गावातल्या घरातुन इकडे शेतात रहायला आलीय जरा लक्ष ठेवा. म्हातारं माणुस आहे. मी डबा देते घरुन पण म्हातारी खाते की नाही माहीत नाही." मम्मीला वाटले, असेल सासु-सुनेचे भांडण म्हणुन तिने पुढे काही विचारले नाही. असेच मधे ३-४ दिवस गेले. आणि मग आज्जी दिसली नाही बाहेर. मम्मीला वाटले भांडण मिटले असेल गेली असेल घरी. पप्पांना सांगीतल्यावर ते म्हणाले, "हिंदुराव माळ्यांची आई आहे ती, बघुन ये आहे का खोपटात."

मम्मी आणि तिच्या मागे सुबोध गेले शेत तुडवत खोपटात. दोघे साधारण १५-२० मिनिटानी परत आले ते ’माळी आज्जीला बरे नाही. dehydration सारखे झालेय. मग मम्मीने खसखषीची का आल्याची कसलीतरी खीर करुन नेउन दिली. दुसरेदिवशी सकाळी मला आणि सुबोधला परत चहा घेउन तिच्याकडे पिटाळले. आणि अशी अमची आणि माळीआज्जीची ओळख झाली.
तिला भेटल्यावर प्रकर्षाने जाणवलेल्या दोन गोष्टी म्हणजे आज्जीला ऐकु कमी येते आणि आज्जी अतिशय बारीक आहे.
हळुहळु ओळख वाढल्यावर कळले की आज्जीबाई सुनेशी नाही तर मुलाशी भांडुन वेगळ्या राहील्यात. सुनेची अतिशय तारीफ़ करत असत. लेकीसारखी सांभाळते वगैरे वगैरे! त्याकाळात ते ऐकायला पण वेगळे वाटायचे. आज्जीची सांपत्तिकस्तीथी फारशी चांगली नव्हती. नातु कमवत होता ते पण कॉलेज बांधताना या लोकांच्या जमिनी घेउन घरटी एक माणुस नोकरीवर घ्यायची संस्थेने कबुल केल्यामुळे लागलेली ति नोकरी होती. स्वत:च्या शिल्लक राहीलेल्या जमीनी पिकवायची घरात कुणाला इच्छा नव्हती.
पुढे पाउस सुरु झाल्यावर आज्जीने निशिगंध आणि गलांड्याच्या फुलांची झाडे लावली. फुले यायला लागल्यावर आज्जी मग सतत शेतात दिसायला लागली कारण कॉलेजच्या पोरी जाता येता फुले तोडुन न्यायच्या. मग प्यायला पाणी मागायच्या निमित्तने म्हणा किंवा मम्मीने चहा घ्या म्हणल्याने म्हणा आज्जीचे आमच्याकडे जाणे-येणे वाढले. तिचा मम्मीवरचा विश्वास पन वाढत गेला. मग फ़ुले विकुन आलेले पैसे ती आमच्याकडे ठेवु लागली. पुढे एकेदिवशी बाजारातुन येताना १ किलो मटकी घेऊन आली आणि मम्मीला म्हणाली मला जरा एक मोठे पातेले दे. मग निवडुन ती मट्की धुवुन भिजवुन ठेवली. दुसरेदिवशी एक स्वच्छ पोते आणि साडीचा तुकडा घेउन मटकी बांधायला. आणि मग २ दिवसानी सकाळी सकाळी ६ वाजता ती मोडाची पाटी घेउन आज्जीबाई तुरुतुरु कराड्च्या मंडईत विकण्यासाठी गेल्या! दुपारी १२-१ वाजता घामाघुम होऊन घरी! सगळी मटकी विकुन आलेले पैसे मोजुन घेउन परत पुढची मटकी आणलेली.

आज्जीला कष्टाची अतोनात सवय होती. सतत काही ना काही चालु असायचे. सगळीकडे चालत फ़िरायची कारण तिला बसमधुन वगैरे कोणीतरी पळवुन नेतील असे वाटायचे. स्त्रिशिक्षण वगैरे भानगडीमधे आज्जीबात रस नव्ह्ता. स्वत:च्या नातीला ७ वी झाल्यावर लांब शाळेत पाठवायचे नाही असे म्हणुन शाळा सोडायला लावलेली होती. आवाज अतिशय खणखणीत असल्याने तिने जाहीर केलेला निर्णय पण अख्ख्या गावाला कळलेला असला पाहीजे. आठवी-नववीत मी अजुन का शाळेला जाते ते तिला कळायचे नाही. सुट्टीच्यादिवशी कधी आज्जी शक्यतो घरी यायची नाही कारण पप्पा घरी असायचे. कधि चुकुन लक्षात न राहील्याने आलीच तर पप्पांना ’दादा काय चाल्लय? बाईने (म्हणजे मम्मीने) चा दिला का नाय?’ अशी चौकशी करुन मम्मीशी बोलुन पटकन जायची. मी सतत पुस्तक हातात धरुन असायचे त्याचा बरेचदा रागराग पण करायची. माझे ८-९ वी मधले वय असल्याने त्याचा बरेचदा राग पण यायचा. नंतर कधीतरी तिने मला भरतकाम करताना पाहीले आणि बरीच खुश झाली. ती नेहमी कुठल्या कुठल्या भाज्या आणुन द्यायची त्यात हरभ~याची भाजी, घाटे, चवळीच्या कोवळ्य़ा शेंगा, कांद्याची पात, लसणीची पात, श्रावण्घेवडा, काळ्या घेवड्याच्या शेंगा. तिच्यामुळे ह्या सगळ्या भाज्या अपसुक मिळायच्या. हे सगळे आणुन द्यायची त्याच्याबदल्यात १ कप चहाची पण तिची अपेक्षा नसे. कष्टाची अतोनात सवय होती त्यामुळे कुठले काम जड जायचे नाही. पण घरातल्या कुणाचीच साथ नसल्याने त्या कष्टाचे चिज कधी झालेच नाही. नातवंडांची लग्ने निघाली तेव्हा तिने साठवलेल्या पैशातुन नातीला साडी, नातसुनेला साडी घेतलेली आठवते. मग सुन करेल म्हणुन एक म्हैस घेउन दिली. सुनेला ते पण जमले नाही. म्हातारीने त्याचे सगळे कर्ज फ़ेडले बारीकसारीक कामे करुन पण ती म्हैस विकुन आलेले पैसे उडवायला घरच्यांना १ महीना पण लागला नाही!

माळीआजीमुळे अजुन एक गोष्ट कळली म्हणजे त्यांच्या गावात श्रावण महिन्यात ज्ञानेश्वरीचा सप्ताह होत असे. मी ९ वि मधे असताना प्रसाद घेउन मी आणि मम्मी गेलेलो. त्यावेळी ३ रा अध्याय पठण चालले होते. शाळेत तेव्हा आम्ही रोज ५ श्लोक अशी गीता म्हणायचो श्लोकाचे अर्थ अवघड वाटायचे. त्यादिवशी अर्धा एक तास जे काही तिथे वाचायला बसलेले तेव्हा एक-दोन श्लोकांचे अर्थ लागलेले पण आठवतात.

अशी ही माळी आज्जी आज अचानक आठवली. ती गेली तेव्हा माझी १२ वीची परिक्षा चालु होती. त्यामुळे तिचे शेवटचे दर्शन नाही मिळाले. पण तिची आठवण कित्येक दिवस मनात रेंगाळत होती. डिसेंबर मधे घरी गेले असताना मुलगा, नातु यांनी राहिलेल्या शेताचे विकुन खाल्याचे समजले आणि आजीने इतकी मेहेनतीने सांभळलेली जमीन घरच्यांनी अशी उडवलेली पाहुन अतोनात दु:ख झाले. ती बिचारी हे बघायला नव्हती तेच बरे झाले असे वाटुन गेले एकदम ...

Sunday, March 04, 2007

निर्मोही !!??!!

मेधाने महत्वाचा प्रश्नाला हात घातलाय - तुमच्या पुस्तकांची तुमच्यानंतर तुम्ही काय सोय लावणार आहात? असले अतिशय high funda विषय मला कधीच कसे सुचत नाहीत असा विचार करतच हे लिखाण करतेय.

खरंच माझी पुस्तके माझा जीव की प्राण आहेत. कुणी पुस्तकचे कोपरे वगैरे दुमडुन खुण वगैरे करत असेल तर मला प्रचंड राग येतो. देशात काहीही विकत घ्यायला जमत नसेल तर वाईट वाटत नाही पण दिलखुष बुकस्टॉला जाता आले नाही तर मात्र खुपच त्रास होतो.

मला पुस्तकांची आवड पप्पांच्यामुळे लागली. त्यांनी स्वत:ला पुस्तकांच्यासोबत रहायला आवडेल म्हणुन ग्रंथपालाची नोकरी पत्करली. स्वत:चे कित्येक पगार पुस्तकांवर खर्च केले. आम्हाला कधी बाहेर खायला घेउन गेले नाहीत पण चांगली पुस्तके वाचायला मिळावीत, संग्रही असावीत म्हणुन खुप खर्च केला. प्रसंगी मम्मीशी वादावादी पण झाली असेल. त्यांच्याकडे श्रीमानयोगीचे २ खंड आहेत तेही पहिल्या आवृत्तीतले आणि त्यांनी नावनोंदणी करुन घेतलेले. तसेच पुलंची खुप पुस्तके पहिल्या / दुस~या अवृत्तीतली. प्रकाश संतानी स्वत: स्वाक्षरी करुन भेट दिलेली पुस्तके. असले collection असताना त्याचे पुढे काय हा विचार करावासाच वातत नाही. मला भारतातुन येताना ती सगळी पुस्तके इकडे आणायची खुप इच्छा आहे त्यासाठी पप्पा तर तयार होतील कारण त्यांची पोरे सुस्थळी पडतील याची त्यांना खात्री आहे पण सुबोध आणि मम्मी असे दोन मोठे अडथळे पार करावे लागतील. 'मोह वाईट' वगैरे वाक्ये पुस्तकात लिहायला ठिक पण ती प्रत्यक्ष आचरणात आणणे काही शक्य वाटत नाही. पुस्तकांच्या बाबतीत तर नाहीच. पप्पांच्या पुस्तकांचे जाउदे पण माझ्या पुस्तकांचे काय करायचे? फ़ार काही मोठे collection नाही माझे पण आहे ते माझे आहे. संभाजी, बापलेकी, शरदासंगीत, वनवास, शाळा, गौरी देशपांडेंची बरीचशी पुस्तके, अनील अवचटांची पुस्तके!! माझ्यानंतर माझ्या ह्या लेकरांचे काय होणार? माझ्यानंतरचे जाउदे पण कायमचे भारतात जायचे ठरवले तर त्या पुस्तकांचे काय करायचे? लालूने दिलेले गिफ्ट, बाळुदादानी दिलेली पुस्तके अशी पुस्तके कुणाला नाही देऊ शकणार. काही पुस्तके अगदीच टाकावु आहेत त्यांचे काय करायचे हे ठरवणे खुप अवघड जाणार नाही पण माझ्या प्रिय पुस्तकांचे काय?

माझ्या दागदागीनांचे, साड्या, कपड्यांचे काय करायचे ते ठरवताना कदाचीत मला त्रास होणार नाही. पुस्तकांच्या बाबतीत निर्मोही होणे मला तरी शक्य होईल असे वाटत नाही? तुम्हाला काय वाटते? तुम्ही ठरवलेय तुम्ही तुमच्या पुस्तकांचे तुमच्यानंतर काय करायचे? कुणाला ह्यावर Tag व्हायला आवडेल?

Wednesday, February 28, 2007

होळी रे होळी ... पुरणाची पोळी

होळी आली की मला आठवतात त्या लहानपणी शिवाजी हौसिंग सोसायटी मधे केलेल्या २-३ होळ्या. मी दुसरीला वगैरे असेन तेव्हा. आमच्या घरी होळी असायची नाही म्हणुन मग शेजारच्या पाटलांच्या घरची होळी सकाळी सकाळी बघायला जायचे. मग सोसायटीच्या मोठ्या मुलांबरोबर लाकडे गोळा करत फ़िरायचे कारण सुट्टी असायची. शेखरदादा, शिवाकाका, दिलिप्या, राजा, हरीश, मुन्या, बकी, सविता बरीच पलटण असायची. मम्मीला बहुदा माहीत नसायचे कुठे जाणार ते. पण मुन्या आणि शिवाकाका लक्ष ठेवुन असायचे. कुठे काटे लागत नाहीत ना, कुठे तारेत कपडे अडकत नाहीत ना ते. कारण हे सगळे मम्मी पप्पांचे विद्यार्थी! त्यामुळे माझ्यापेक्षा तेच त्यादोघांना घाबरुन असत.

कुणाच्या शेणी चोर, कुणाला सांगुन मागुन आण, शेताच्या कडेला कुणी काढुन ठेवलेले जळणच उचल, शेतातल्या खोड्क्या वेच, आणि जर नुकताच बैल बाजार झालेला असेल तर मग तिथुन शेण्या गोळा करुन आण असले उद्योग चालायचे. आम्हा बरक्या पोरांचे काम फक्त मोठे कोणी बाजुने जात नाही ना ते पहायचे आणि मोठ्या पोराना सांगायचे. जेवायला घरी आले की मम्मीचा आणि पप्पांचा ओरडा खायचा कारण ऊन वाढलेले असायचे आणि परीक्षा जवळ आलेली असायची. जेवुन मग अभ्यासच करावा लागायचा कारण तेव्हा मम्मी पप्पा पण आपापल्या कामातुन मोकळे होउन आमच्यावर लक्ष ठेवायला रिकामे झालेले असायचे. मग एक डोळा बाहेर होळी रचणा~या मुलांवर ठेवुन कसाबसा अभ्यास संपवायचा. आणि ४-५ वाजता दुध पिउन मम्मीला लाडीगोडी लावुन बाहेर पळायचे. मधोमध एक एरंडाचे झाड असायचे आणि त्याभोवती होळी रचलेली असायची. रचलेली होळी ४-५ वेळा प्रदक्षिणा घालुन बघायची आणि आपण गोळा केलेल्या मालाचे ते नवे रुप बघुन आचंबीत व्हायचे!!

रात्री मग बरीच मोठी मुले, घरची मोठी माणसे होळीभोवती जमा व्हायची. कोणीतरी मोठे माणुस होळी पेटवायचे आणि मग होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जायचा. आणि तो नैवेद्य मग होळीत टाकुन पहीली बोंब ठोकली जायची! आणि मग काय ज्यानी पहीली बोंब ठोकली त्यांच्या नावाने जमलेली सगळी जनता बोंब मारायची. तिथुन जो दंगा सुरु व्हायचा की बास. सोसायटीमधल्या प्रत्येकाच्या नावाने पोरे शंख करायची!! पण आम्ही सगळे दारातुनच बघायचो. आम्हाला ओरडायची परवानगी नसे. पण तरी आम्ही ते ओरडणे enjoy करत असु.

रात्री केव्हातरी तो कार्यक्रम संपायचा त्याआधीच कधीतरी आम्ही थकुन झोपी गेलेलो असायचो!!

आणि आठवते ती एक दोन वेळा पाहीलेली आज्जीच्या घरची बारकीशी होळी. ५ गोव~यांची अप्पानी रचलेली. आज्जी त्याभोवती रांगोळी काढायची. मग अप्पा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचे आणि मग एकटेच ४-५ वेळा बोंब ठोकायचे ती पण एकदम हळुच! सोसायटीच्या होळीचा हंगामा कधीच तिथे नसायचा :)

इथे होळी म्हणजे उत्तर भारतीय पद्धतीने रंगाची खेळतात. मला ते रंगात ओले होणे आणि खेळणे फ़ारसे आवडत नाही त्यामुळे त्या विकेंडला घरी पुरणपोळीचे जेवण करुन मस्त ताणुन द्यायचे अशीच होळी गेले कित्येक वर्षे साजरी करतेय :)

म्हणा होळी रे होळी .... पुरणाची पोळी!!

Tuesday, February 13, 2007

शिक्षक पहावे होऊन ...

मी विद्यार्थी अवस्थेतुन शिक्षकावस्थेत कधी शिरकाव केला ते अजुनही नीट आठवते. M.Sc. ची २ वर्षे सोडली तर जवळपास १० वर्षे शिक्षकी केली. बीजगणित-भूमिती, चित्रकला, विणकाम, भरतकाम असले एकमेकांशी संदर्भ नसलेले विषय शिकवले. मम्मीच्या १ली ते ४थी च्या मुलांना मराठी, गणित, इतिहास, भूगोल पण शिकवले.

मला आठवते, मी पहीली दुसरीत असताना मम्मी आणि पप्पा मिळुन शिकवण्या घ्यायचे. त्या घरातुन मग दुसरीकडे रहायला गेल्यावर पप्पांनी ते सोडुन दिले पण मम्मीच्या पहिली ते सातवी शिकवण्या चालु होत्या. त्यातुन ती दुपारी शिवणकाम पण शिकवत असे. घरामधे सतत कोणी ना कोणी काहीतरी शिकत/शिकवत असेच. माझा आणि सुबोधचा अभ्यास पण त्या मुलांबरोबरच होत असे बरेचदा. हे सर्व पहाता पहाता मी स्वत: शिक्षीका केव्हा झाले ते मला समजले देखील नाही.

माझी पहीली विद्यार्थीनी म्हणजे सोनाली. ती शाळेत नेहमी व्यवस्थीत अभ्यास करणार, पहील्या पाच नंबरमधे येणारी ही मुलगी आठवीमधे गणितात कशीबशी पास झाली आणि तिच्या आईला एकदम टेंशन चढले! मग क्लासेसची चौकशी सुरु झाली. काही कारणांमुळे बाहेर कुणाकडे क्लास लावता येणे शक्य नव्हते. असेच बोलता बोलता मला समजले आणि मी तिला सांगितले की, जी गणिते आडतील ती विचारयाला येत जा! अशी अडलेली गणिते सोडवताना तिला वाटले की आपण इथेच रोजची शिकवणी लावाली तर! पण मला जबाबदारी घ्यायची नव्हती कारण माझी practicles, journals, college ह्यातुन मला कितपत जमेल असे वाटत होते. पण खुप आग्रह झाला आणि मग ती जबाबदारी घेतलीच शेवटी. ती रोज येते हे कळल्यावर मग जवळच्या एका शेतकर्यांची मुलगी पण म्हणाली मी पण येणार! झाले मग ह्या दोन पोरी आणि मी आमची सकाळी ८ वाजल्यापासुन गणिताशी झटापट सुरु व्हायची ती मी कॉलेजला किंवा त्या शाळेत जाईपर्यंत!! आणि ह्या शिकवणीचे निकाल, निक्काल प्रकारात न लागता एकदम चांगले लागले. सोनाली १५० पैकी १३२ गुण मिळवुन पहिल्या १५ मधे तरी परत आली आणि ज्योती आठवीला पुढे ढकलली गेलेली तिला १५० पैकी ९० गुण मिळाले. आणि ह्या सर्व गोष्टींचा माझ्या आभ्यासावर काहीही परिणाम (म्हणजे वाईट हो!!) झाला नाही.

पुढे १ली ते ७ वी पर्यंत जे कोणी येईल त्यांना जो लागेल तो विषय शिकवला. बर्याच मुलाना अभ्यासाचे महत्व पटले, गोडी लागली हे त्यांचे आणि माझे दोघांचेही नशिबच म्हणा ना!

M.Sc. करुन परत आल्यावर काय करायचे असा विचार चाललेला होताच. तेव्हा कॉम्प्युटरचा एखादा डिप्लोमा करावा म्हणुन पराडकर क्लासेसला गेले. पराडकरसरांनी सगळी चौकशी करुन मला विद्यार्थी + शिक्षीका असा दुहेरी मुकुट घातला. सकाळी ७.३० ते १२.३० शिक्षक आणि दुपारी २ ते ३ विद्यार्थी असा दिवस विभागला जायला लागला. त्यावेळचे विद्यार्थी म्हणजे अजय शहा वगैरे. अतिशय सज्जन मुले. आयुष्यात काहीतरी करुन दाखवायचे ही जिद्द असलेली. त्यामुळे सतत नवीन शिकण्याच्या मागे. ह्या मुलांना मी त्यावेळी MS Windows, Word, Lotus वगैरे fundamentals शिकवायचे. आजच्या technology च्या मानाने हे फ़ारच जुनेपुराणे वाटते पण त्यावेळी खरोखर ते शिकवण्यासाठी क्लासेस होते.

पुढे पराडकरसरांना १०वी च्या summer vacation साठी teaching assistant हवा होता. मग ते पण माझ्याच गळ्यात आले. १० वीची डामरट पोरे ती पण उन्हाळ्याच्या सुट्टीत अभ्यासाला बसवायची यासारखे कौशल्याचे काम इतर कोणतेही नाही! काय त्या खोड्या, काय ते अभ्यास न करण्याचे बहाणे अहाहा!! पण वर्गात एकदम धमाल असायची. मुलींतर नेहेमी मागे मागे असायच्या. तिथे रोज साड्या नेसुन जायची सवय झाली. मग पोरींच्या साड्याबद्दल कॉमेंटस आणि कॉम्प्लिमेंट्स, आवर्जुन फुले आणुन देणे वगैरे नेहेमीचे झाले. तेव्हाच मी रोज सातारला पण जायचे शिकवायला. तेव्हाच कम्युटींगचा पहीला अनुभव पदरात पाडुन घेतला. कराडमधे विद्यार्थी गावात कुठेही भेटायचे, बसमधे, रिक्षात, घाटावर, मंडईत. काहीजण मुद्दम ओळख दाखवुन बोलायचे तर काही आपले लक्ष नव्हते असे दाखवायचे! एकुण मजा यायची.
ह्या मुलांपैकी काहीजण आता US मधे नोकरी, उच्चशिक्षणासाठी आलेत. ऑर्कुटवर भेटतात. मजा वाटते.

त्याचदरम्यान कराड इंजिनीअरींग कॉलेजमधे प्रॅक्टीकल घेण्यासाठी कोणितरी हवे आहे असे कळले. सहज जाउन मी तिथे प्रिन्सिपलना भेटले तर त्यांनी ताबडतोब काम सुरु करायला सांगीतले. डिपार्टमेंट हेडना जेव्हा कळले की मी Statistics मधे M.Sc. केलेय तेव्हा त्यांनी लगेचच मला probability चे एक लेक्चर घ्यायला सांगितले. ते स्वत: मागे येउन बसले. माझे शिकवणे त्यांना बरे(!) वाटले असावे, पुढे आठवड्यातुन २ तास घेण्यास सांगितले. दुस~या सेमीस्टर ला मग Numerical Mathematics शिकवला. Practicles करताना लक्ष ठेवणे वगैरे चललेलेच होते. इथले माझे विद्यार्थी माझ्याहुन कसेबसे १ ते २ वर्षाने लहान होते. पण उच्चशिक्षणासाठी आल्याने व्यवस्थित अभ्यास वगैरे करायचे. अर्थात टवाळक्या वगैरे पण व्हायच्याच. काही मित्रासारखे मदतीला आले. तिथे मी अडिच वर्षे शिकवले. २ बॅचेसना शिकवले, ज्योतीसारखी जिवाभावाची मैत्रीण मिळाली. खुप चांगले, थोडे वाईट अनुभव गाठीशी बांधले.

ह्या काही वर्षांच्या ब~या-वाईट अनुभवांची शिदोरी आता जन्मभर पुरणारी आहे. सगळ्यात जास्ती कसोटी लागली ती एका गुणाची - patience!!!

Tuesday, November 28, 2006

रविवार माझ्या आवडीचा ...!!??!!

दिवस उद्याचा हा सवडीचा
रविवार माझ्या आवडीचा

गेले कित्येक रविवार काम, खरेदी, कुणाचे वाढदिवस अशातच चालले आहेत. खुप दिवसापासुन रविवारी फ़क्त आराम करायचा, गाणी वगैरे ऐकत मनसोक्त पुस्तके वाचायची, मनसोक्त चित्रे काढायची इच्छा आहे. मला आठवतात ते सगळे लहानपणीचे रविवार असेच मस्त लोळत पुस्तक वाचलेले किंवा रंगाच्या गराड्यात बसुन असंख्य चित्रे काढलेले. टेलीव्हीजन नावाचा प्रकार मी लहान असताना म्हणजे मी १०वी मधे जाईपर्यंत घरी आलेला नव्हता त्यामुळे तो सगळा वेळ मला माझे बरेच उद्योग करण्यासाठी वापरता यायचा.

रविवार सकाळ सुरु व्हायची ती नेहेमीप्रमाणे पप्पांनी लावलेल्या रेडीओमुळे, जी अजुनही होते कराडला गेले की! मग मम्मीने कप मधे घालुन दिलेले दुध गरम आहे म्हणुन तासभर पित बसायचे. तास अन तास दुध पित बसते ही रोजची ओरडणी रविवारी पण चुकायची नाहीत! मग अंघोळ वगैरे करुन आठ सव्वाआठला बालोपासनेला जायचे आणि रमत गमत साडेदहा पर्यंत परत यायचे. कधी मम्मी पप्पा मंडईत गेलेले असायचे, मग ते येईपर्यंत लैलाच्या आई घरात बसवुन ठेवायच्या. तोपर्यंत मग पेपर अलेला असेल तर (तेव्हा कराडला लोकसत्ता दुपारपर्यंत कधीतरी यायचा) बालविभाग वाचत बसायचे. किशोर, कुमार ही मासीके पण घरी यायची, अमृत पण असायचा काहीतरी वाचत बसायची खोड लागली. मम्मी पप्पा मंडईतुन आले की जेवण करुन जेवुन मम्मी पेपर वाचत बसायची कोडी सोडवणे हा तिचा आवडता छंद होता. दुपारभर चित्रे काढणे, सुबोधबरोबर भांडणे, बाहेर खेळायला जाऊ का अशी भुणभुण लावणे. पप्पांची डुलकी झाली की ते दुपारी विविधभारती, किंवा सिलोन रेडीओवर हिंदी गाणी लावायचे. काही कळायचे नाही पण कानावर पडायचे.

कधी कधी सकाळी उठायला उशीर झाला आणि बालोपासनेला गेले नाही तर मग सकाळचे बालोद्यान ऐकायला मिळायचे. शमा खळे, रचना आणि योगेश खडीकर यांची गाणी अगदी तोंडपाठ होती. पप्पांना गाणी ऐकायची प्रचंड हौस होती (आणि अजुनही तितकीच आहे!) त्यामुळे कामगार सभा, आपली आवड, लहान मुलांची आपली आवड, दुपारी मुंबई ब केंद्रावर लहान मुलांच्यासाठी कथावाचन वगैरे असायचे. फास्टर फेणे, गोट्या पहिल्यांदा तिथे ऐकले. टी.व्ही नव्हता त्यामुळे संध्याकाळी सगळी गल्ली डबाऐसपैस, लगोरी, लपाछपी असले फुटकळ खेळ खेळायचो. पण ते सुद्धा संध्याकाळीच कारण मम्मी पप्पा आज्जीबात दिवसभर घरातुन बाहेर पाठवायचे नाहीत. घरात बसुन वाचन करणे, अभ्यास करणे, चित्रे काढणे हे सगळ्यात महत्वाचे वाटे. आजुबाजुला रहाणारी मुले-मुली म्हणजे एका वर्षात २ वेळा बसले तरी चालते ह्या प्रकारात मोडणारी होती त्यामुळे पण असेल. आठवीनंतर ३ वर्षे शेजार नव्हताच त्यामुळे मग माझेच काही काही उद्योग चालायचे. त्या दरम्यान रवीवारच्या सुट्टीत केलेला एक अतीशय महत्वाचा उद्योग म्हणजे मैत्रीणीन्च्या घरी जाउन वेगवेगळी फुलझाडे गोळा करणे, वेलींना आलेल्या फुलांचे गाठींचे गजरे करणे!!

काय धमाल दिवस होते! गेल्यावर्षी मामेभावंडांचे रविवार बघीतले आमच्याच गावात, ह्या पोरांना रेडीओ माहीत नाही, बालगीते माहीत नाहीत, दिवसभर कसले कसले क्लास आणि टी. व्ही.!! कळत नाही ही मुले काही गमावताहेत की आम्ही खुप सारे क्लास न करुन खुप काही शिकलो नाहीये ...

जोगीण

काल प्रिया च्या चाट चा status message ह्या कुसुमाग्रजांच्या कवितेच्या पहिल्या ३ ओळी होत्या. मी कवीतांपासुन नेहेमी ४ हात लांब रहाणारी, पण ह्या ओळी मात्र एकदम भावल्या. तिच्या परवानगीने मग मी तो माझा status message केला (अर्थात तिला दुसरी ह्या कवितेसारखी अजुन एक मस्त कविता मिळालीच!!) त्यावर अजुन एका मैत्रीणीने विचारल्यावरुन ही सगळी कवीता इथे टाकतेय.

जोगीण

साद घालशील तेव्हाच येईन,
जितकं मागशील तितकंच देईन...
दिल्यानंतर देहावेगळ्या सावलीसारखी निघून जाईन...

तुझा मुगुट मागणार नाही,
सभेत नातं सांगणार नाही...
माझ्यामधल्या तुझेपणात जोगीण बनुन जगत राहीन...

~कुसुमाग्रज

सुमेधा, वृषाली सारख्या मैत्रीणीना आश्चर्याचा धक्का बसल्यावाचुन रहाणार नाहीये !!!

Tuesday, November 21, 2006

एकटेपणा

मला सगळ्यात जास्ती नकोसा वाटतो तो एकटेपणा. मला आठवतेय तशी मी सतत माणसांमधेच राहीले आहे. पण माणसांच्या गोतावळ्यात राहुनही कधीकधी एकटेपणा घेरतो त्याला काय म्हणायचे? मला आठवतेय ४थी मधे शाळा सुटल्यावर scholaship चा क्लास असायचा. तो झाला की मी आणि मेघु टंगळमंगळ करत घरी जायचो. घरी जाईपर्यंत साधारण २ वाजायचे म्हणुन शाळा सुटल्यावर खाण्यासाठी मम्मी पप्पांच्याबरोबर १०.३० ला चपाती-भाजी किंवा भाजी-भाकरी-लोणी असा डबा द्यायची. वर्गात सगळ्यांचेच तसे डबे यायचे. आम्ही शाळा सुटल्यावर साधारण १२ वाजता तो डबा खायचो.
घरी पोहोचायचे तेव्हा मम्मीच्या शिकवण्या, शिवणकाम, शिवणकामाचे क्लास असे काही ना काहीतरी चालु असायचे. त्यामुळे मग मला राहिलेला भात वगैरे एकटीलाच खावे लागायचे. एकटीला जेवताना अज्जिबत जेवण जायचे नाही. कसे तरी पोटात ढकलायचे आणि अभ्यास किंवा खेळ सुरु करायचा. मला अजुनही कधितरी ते एकटीने जेवलेले आठवते आणि एकदम एकटेपणाची जाणीव होते. गेले काही दिवस असेच एकटीने जेवतेय. घर थंड पडलेले, बाहेर ५ वाजताच दाटुन आलेला काळोख, ह्या सगळ्यामुळे खाण्याची इच्छाच नाहीशी होते. मग हा एकटेपणा घालवण्यासाठी रोज घरी भारतात फोन करायचा किंवा मग रात्री उशीरापर्यंत chatting करत बसायचे. सकाळी मग नीट जाग येत नाही वेळेवर मग निश्चय करायचा कि आजपासुन वेळेवर झोपायचे!
सध्या घरी सुबोधच्या लग्नाची तयारी खुप जोरात चालली आहे आणि मी सगळे मिस करतेय. ते मला मिस करताहेत की नाही महिती नाही, असावेत असे वाटतेय. पण ह्या सगळ्यामुळे मला माझ्या एकटेपणाची जाणीव खुप प्रकर्षाने होते आहे. जेवावे वाटत नाही. काहीही न करता फ़क्त बसुन रहावे असे वाटत रहाते. सगळ्या जगावर चिडचिड होते. पण ती चिडचीड कुणालाच कळत नाही.

गेले काही वर्षे एका अर्थाने एकटीच रहातेय, पण एकटेपणाची सवय मात्र अजीबातच झालेली नाहीये. कधीकधी ह्या गोष्टीचा आनंद होतो कधी स्वत:चा प्रचंड राग येतो.

आज मला सतत ऐकावे वाटतेय असे गाणे -
मै और मेरी तनहायी अक्सर ये बाते करते है।



ह्या गाण्याचा आणि एकटेपणाचा काही संबंध आहे का? असावा ...